ठाणे, 13 फेब्रुवारी : नवी मुंबईतील दिग्गज नेते गणेश नाईक यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर आता गणेश नाईक यांच्या गटाचा नवी मुंबई महापालिका निवडणुकीत पराभव करण्यासाठी राष्ट्रवादीने कंबर कसली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही जबाबदारी पक्षाचे नेते शशिकांत शिंदे यांच्यावर सोपवली आहे. त्यादृष्टीने शशिकांत शिंदे यांनी पहिलं पाऊल टाकलं आहे.
भाजपचे काही नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. 'शरद पवार आणि अजित पवार यांना मानणारा वर्ग अजितदादांना भेटला. भाजपचे 4 विद्यामान नगरसेवक आणि 5 माजी नगरसेवकांचा यामध्ये समावेश आहे. या सर्वांनी अजित पवार यांना भेटून त्यांच्याकडे राष्ट्रवादीमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे,' अशी माहिती देत शशिकांत शिंदे यांनी नवी मुंबईच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.
'ही लढाई कोण्या एका व्यक्तीची नाही. भाजपला उतरती कळा लागली आहे,' अशी टीका शशिकांत शिंदे यांनी केलं आहे. तसंच यावेळी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला. 'चंद्रकांत पाटील यांना महाराष्ट्र ओळखतो का? गंभीरपणे घेतो का? असा सवाल करत शशिकांत शिंदे यांनी चंद्रकांत पाटलांचा समाचार घेतला.
राष्ट्रवादीने पणाला लावली ताकद
काही दिवसांपूर्वीच नवी मुंबईत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला होता. या मेळाव्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीनही पक्षाच्या नेत्यांनी गणेश नाईक यांना आव्हान दिलं होतं.
नवी मुंबई महानगर पालिकेची निवडणूक जवळ आल्यानंतर आता वातावरण तापू लागलं आहे. ही महापालिका निवडणूक काँग्रेस, सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे लढवणार आहेत. याच निवडणुकीची तयारी म्हणून वाशी येथे महाआघडीचा मेळावा झाला. या मेळाव्यात राष्ट्रवादीचे नेते आणि आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडत भाजपमध्ये प्रवेश केलेल्या गणेश नाईक आणि कुटुंबावर घणाघाती टीका केली.
'आगामी निवडणुकीनंतर नवी मुंबईत कुणी महापौर होईल, कुणी स्थायी समिती अध्यक्ष होतील, कुणी सभापती होतील, पण नाईक कुटुंबातील कुणी काहीही होणार नाही,' असं म्हणत अजित पवार यांनी निवडणुकीच्या मैदानात दंड थोपटले. महाआघाडीच्या नवी मुंबईतील मेळाव्याला अजित पवार, एकनाथ शिंदे आणि अशोक चव्हाण हे नेते उपस्थित होते.
'ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी असतात. नवी मुंबईतील एकाधिकार शाही खपवून घ्यायची नाही,' असं म्हणत अजित पवार यांनी नाईक कुटुंबाच्या नवी मुंबईतील वर्चस्वाला सुरुंग लावण्यासाठी महाआघाडीच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं होतं. तसंच ज्या पदाधिकाऱ्यांना नगरसेवकपद मिळणार नाही, त्यांना महामंडळ आणि जिल्हा समित्यांवर घेणार, असं म्हणत अजित पवार यांनी संभाव्य बंडखोरी रोखण्यासाठी सावध पवित्रा घेतला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.