नवी मुंबई,, 16 मार्च : एकीकडे ठाण्यामध्ये भाजपला मोठं खिंडार पडणार असल्याच्या चर्चा समोर येत असताना नवी मुंबईमध्ये पुन्हा एकदा भाजपला धक्का बसला आहे. भाजपच्या 2 नगरसेविकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. महाविकास आघाडीच्या संसाराला सुरुवात झाल्यानंतर अनेकांनी भाजपचा हात सोडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत प्रवेश केला आहे. आताही भाजपच्या कविता आगोंडे, सुरेखा नरबागे यांनी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे राजीनामा सोपवत शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या या जाण्यामुळे हा गणेश नाईकांसाठीही मोठा धक्का मानला जात आहे.
फेब्रुवारी महिन्यातदेखील नवी मुंबईमध्ये भाजपच्या 4 नगरसेवकांनी राजीनामा देत शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. नवी मुंबईतून भाजपला मोठं खिंडार पडलं आहे. नवी मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ आली असताना भाजप नेते गणेश नाईक यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे. नवी मुंबईच्या राजकारणावर आणि महापालिकेवर गेली अनेक दशकं एकछत्री साम्राज्य गाजवणारे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांच्या साम्राज्याला सुरुंग लागला आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे आतापर्यंत भाजपच्या 6 नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे. हे सर्व नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
हे वाचा - राज ठाकरेंच्या प्रश्नाला चिमुकलीनं दिली गोड पप्पी, VIDEO व्हायरल
तुर्भेतील नगरसेवक सुरेश कुलकर्णी, राधा कुलकर्णी, संगीता वास्के, मुद्रिका गवळी यांनी राजीनामा दिला होता. महापालिका आयुक्त आणि सचिवांना राजीनामे सोपवले होते. नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केल्याने त्यामुळे गणेश नाईकांना जोरदार धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते असलेले गणेश नाईक यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महापालिकेतल्या सर्व नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता. नवी मुंबई महापालिकेत गेली अनेक वर्ष ही राष्ट्रवादीची सत्ता आहे.
नाईक हे आपल्या सर्वच नगरसेवकांसह भाजपमध्ये आल्याने मुळ भाजपच्या असलेल्या नगरसेवकांमध्ये असंतोषाची भावना आहे. आपल्याला डावललं जातेय अशी त्यांची भावना असून त्यामुळे त्यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जातं आहे. दरम्यान, ठाणे जिल्हा भाजपमध्ये धुसफूस सुरू असल्याचं गेल्या अनेक दिवसांपासून बोललं जात आहे. त्यातच तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी होत असताना भाजपचे माजी ठाणे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांनी डी वाय फाउंडेशनच्या वतीने बालाजी चषकाचे आयोजन केले होते. यावेळी गेल्या पाच वर्षांपासून भिवंडीपासून अलिप्त असलेले युवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी ठाणे जिल्ह्यात भाजपला मोठे खिंडार पडणार असल्याचे संकेत दिल्याने भाजपमध्ये चांगलीच खळबळ माजली आहे.
हे वाचा - पतीनं डोळ्यांदेखत पाहिला पत्नीचा मृत्यू, मेट्रोच्या मिक्सर कारची धडक बसली अन्...
भाजपचे माजी ठाणे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे हे काँग्रेसमध्ये जिल्हाध्यक्ष असताना काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी भिवंडीत येऊन महात्मा गांधी आणि आरएसएस यांच्याबाबत विधान केल्याने त्यांना भिवंडी कोर्टाची वारी करावी लागली होती. मात्र मोदी सरकार आल्याने चोरघे भाजपमध्ये दाखल झाले होते. मात्र भाजपमधील गटबाजीने ते पुन्हा काँग्रेसमध्ये येणार असल्याचे संकेत सत्यजित तांबे यांनी त्यांच्या भाषणातून दिले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Lok sabha election 2019, Maharashtra, Narendra modi, NCP, News, Shivsena