मुंबई, 31 डिसेंबर : मुंबईकरांसाठी (Mumbai) एक सर्वात महत्त्वाची बातमी आहे. कोरोनाची तिसरी लाट (Corona third wave) मुंबईत धडकल्याने आता प्रशासनाने कडक निर्बंध लावण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाचा संसर्ग जास्त पसरु नये म्हणून हे निर्बंध ठेवण्यात येत आहेत. या नव्या निर्बंधांनुसार मुंबईत आता संध्याकाळी पाच ते पहाटे पाच वाजेपर्यंत चौपाटी, सार्वजनिक ठिकाणं, गार्डन किंवा रिकाम्या मैदानावर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. हे निर्बंध 15 जानेवारीपर्यंत लागू असतील, अशी माहिती पोलिसांकडून (Mumbai Police) देण्यात आली आहे. तसेच मुंबईतील रात्रीची जमावबंदी (Section 144) ही 7 जानेवारी ऐवजी आता थेट 15 जानेवारी 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे. याबाबतची माहिती मुंबई पोलीस सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिलीय.
वर्षअखेर आणि ख्रिसमस निमित्ताने अनेकांना सध्या सुट्टी आहे. या सुट्टीच्या काळात फेरफटका मारण्यासाठी किंवा नवीन वर्षाचं सेलिब्रेशन करण्यासाठी अनेकजण समुद्र किनाऱ्यावर, गार्डन किंवा खुल्या मैदानावर जातात. पण कोरोनाच्या संकटामुळे सर्वसामान्यांना संध्याकाळी पाच ते पहाटे पाच वाजेपर्यंत सार्वजनिक ठिकाणी जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी 15 जानेवारीपर्यंत असेल. मुंबई पोलिसांनी याबाबतचे नवे आदेश जारी केले आहेत. या आदेशाचे नियम मोडले तर कठोर केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा : Sindhudurg District bank election result: सर्वाधिक जागा जिंकत बँकेवर भाजपचं वर्चस्व
"सविस्तर बंदोबस्ताचं नियोजन केलेलं आहे. याच गर्दीचं नियमन, ट्रॅफिकचं नियमन आणि घातपाता विरोधाची सर्व खबरदारी घेतली जाणार आहे. त्याचबरोबर कोविडचे जे नवे निर्बंध लावण्यात आले आहेत त्याची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेबरोबर पोलिसांची पथकं कार्यरत राहणार आहेत. सर्वसामान्यांमध्ये व्यवस्थित मेसेज पोहोचेल यासाठी आपण चांगल्या पद्धतीने तयारी केलेली आहे. अतिशय चांगलं वातावरण आहे. सर्व यंत्रणा सार्वजनिक ठिकाणी लक्ष ठेवत आहेत", अशी प्रतिक्रिया विश्वास नांगरे पाटील यांनी दिली.
राज्यावर नववर्षात मोठे संकट
राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. तर दुसरीकडे ओमायक्रॉनच्या रुग्णामध्ये मोठी वाढ झाली आहे. राज्यात गुरुवारी एकाच दिवसात 85 रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे राज्यात ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या 252 वर पोहोचली आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाने राज्यातील कोरोना रुग्णाबाबतची अधिकृत माहिती प्रसिद्ध केली आहे. गुरुवारी राज्यात तब्बल 85 ओमायक्रॅान रूग्णांचे निदान झाले आहे. यामध्ये मुंबईत 34, नागपूर आणि पिंपरी चिंचवडमध्ये प्रत्येकी 3 रुग्ण आढळले आहे. तर नवी मुंबई आणि पुणे पालिकेत प्रत्येकी 2 रुग्ण आढळले आहे. पनवेल, कोल्हापूर आणि बुलडाण्यात प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे. त्यामुळे राज्यात ओमायक्रॅान रूग्णांचा आकडा आता 252 वर पोहोचला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Lockdown, Mumbai, Mumbai police