नवी मुंबई, 24 जून: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचा (Navi Mumbai airport name controversy) वाद पेटला आहे. लाखो आंदोलकांनी आज सिडको कार्यालयाला घेराव घालण्यासाठी आंदोलन करत आहे. तर दुसरीकडे, मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील (Raju Patil) सुद्धा या आंदोलनात सहभागी झाले आहे. 'नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील (D.B. Patil) यांचेच नाव देण्यात यावे' असं मत राजू पाटील यांनी व्यक्त केलं.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackery) यांनी नवी मुंबई विमानतळ हे मुंबई विमानतळाच्या विस्ताराचा एक भाग आहे, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचेच नाव उचित असणार आहे, अशी भूमिका मांडली होती. त्यांच्या या भूमिकेनंतर मनसेचे आमदार राजू पाटील 'भूमीपुत्रांवर अन्याय होतोय' असं म्हणत आंदोलनात सहभागी झाले.
देशात डेल्टा+ व्हेरिएंटमुळे कोरोनाची तिसरी लाट येणार?, तज्ज्ञांची मोठी माहिती
'राज ठाकरे यांनी सांगितलं आहे की मुंबई विमानतळाच्या विस्ताराचा हा भाग आहे. जर तांत्रिक बाब असेल तर शिवाजी महाराज यांचं नाव आपोआप देण्यात येईल. ती आमची काही मागणी नाही. पण, नवीन विमानतळ होणार असेल तर दि बा पाटील यांचंच नाव दिलं पाहिजे, अशी ठाम भूमिका राजू पाटील यांनी मांडली.
'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ही परिस्थिती टाळता आली असती. एकीकडे ते तिसरी लाट येणार असं सांगत आहे. पण त्यांना कोणतीही काळजी नाही, त्यामुळे आम्हाला आंदोलनासाठी रस्त्यावर उतरावं लागलं आहे, असं राजू पाटील म्हणाले.
दरम्यान, राजू पाटील यांनी आंदोलनात सहभागी होण्यापूर्वी या आंदोलनात आपण का सहभागी होते, याबद्दल फेसबुकवर पोस्ट टाकून खुलासा केला आहे.
'राजसाहेब ठाकरे यांनी नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाबाबत वस्तुनिष्ठ तांत्रिक बाजू मांडली आहे. त्यानंतर अनेकजण विपर्यास करुन त्याचा वेगळा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला गेला, असा दावा पाटील यांनी केला.
'राहता राहिला प्रश्न 24 जूनच्या आंदोलनाचा. तर मी नम्रपणे आणि ठामपणे सांगू इच्छितो की हा मोर्चा आगरी, कोळी, कुणबी, कऱ्हाडी आणि शेकडो वर्षांचा इतिहास असलेल्या भूमीपुत्रांनी काढलेला मोर्चा आहे. राज्यभर जेव्हा मराठा आरक्षणासाठी लाखोंचे मूकमोर्चे निघत होते, तेव्हा जनभावना आणि सामाजिक जबाबदारी म्हणून आंदोलनात सहभागी झालो होतो. आताच्या घडीला तर माझा पूर्ण समाज या आंदोलनात उतरला आहे. त्यांच्या भावनेचा आणि विचारांचा कुटुंबातील एक सदस्य आणि लोकप्रतिनिधी म्हणून मला आदर आहे. कारण त्यांच्या प्रेमामुळेच आपण इथवर पोहोचलो आहोत. त्यामुळे राजकारणात असलो तरी लोकभावना आणि समाजकारण हेच माझं पहिलं प्राधान्य आहे.
म्हणूनच ज्यांनी माझ्या संपूर्ण समाजाला आणि भूमिपुत्रांना रस्त्यावर उतरण्यासाठी भाग पाडलंय, त्यांचा निषेध करण्यासाठी आणि भूमीपुत्रांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी या मोर्चात सहभागी होणार आहोत' असं राजू पाटील म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Raj Thackeray