मुंबई, 1 ऑक्टोबर : गुलाब चक्रीवादळा (Cyclone Gulab)मुळे मराठवाड्यात अतिवष्टीमुळे मोठे नुकसान झाले. हजारो हेक्टर शेती पाण्यात वाहून गेल्याने बळीराजाला मोठा फटका बसला. अशा या संकट काळात नागरिकांना तात्काळ 50 हजार रुपयांची मदत द्यावी अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी केलीय राज ठाकरेंनी केलेल्या या मागणीवर शिवसेना नेते गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी टीका केली. यावर आता मनसेचे नेते अमेय खोपकर (Ameya Kohpkar) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
अमेय खोपकर यांनी ट्विट करत म्हटलं, "गुलाब चक्रीवादळामुळे समजलं की गुलाबरावांच्या डोक्यात किती दुष्काळ आहे ते. राजसाहेब यांनी केलेली मागणी सध्याच्या परिस्थितीत अतिशय योग्य आहे. पण संवेदनाहीन गुलाब ना शेतकऱ्यांचं नुकसान कसं दिसणार? भ्रष्टाचाराचा महापूर आणि अकलेचा दुष्काळ, असले नेते आपल्याला मिळाले हेच तर आपलं दुर्दैव आहे."
राज्यात पावसाचं थैमान: आतापर्यंत 436 जणांचा बळी तर 17 लाख हेक्टर शेतीचं नुकसान
काय म्हणाले होते गुलाबराव पाटील?
गुलाबराव पाटील यांनी म्हटलं, जळगांव जिल्ह्यात 3500 हेक्टर केळीचं नुकसान झालं, अनेक घरं आणी शेतजमिनीचं प्रचंड नुकसान झालं असून पंचनामा आदेश दिले आहेत. प्रत्येकाचा पिकपेरा वेगळा असल्यानं, सरसकट मदत देता येत नाही. पिकांच्या नुकसानीचा पंचनामा करूनच शेतकऱ्यांना मदत देणार, सरसकट पंचनामे म्हणजेच ओला दुष्काळ म्हणून सरकारने नोंद घेतली. कॅबिनेटमध्ये पूर्ण माहिती आल्यावर अंतिम निर्णय होईल. राज ठाकरे यांनी मागणी केली हे मान्य आहे, मागणी करणं सोपं मात्र निर्णय पंचनाम्यानंतर होईल. जिथे असेल परिस्थिती तिथे ओला दुष्काळ जाहीर होणार, राज ठाकरे यांनी मागणी केली म्हणजे काही मोठं काम केलं नाही, राजकारण करू नका.
"शेतकऱ्यांना आपत्तीतून बाहेर काढू, धीर सोडू नका" मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन
काय केली होती राज ठाकरेंनी मागणी?
राज ठाकरे यांनी म्हटलं, "महाराष्ट्राच्या काही भागात, मुख्यत: मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसानं कहर केला आहे. हाता-तोंडाशी आलेलं पीक तर गेलंच आहे. परंतु घरा-दाराचं नुकसानही फार झालं आहे. ही वेळ आणीबाणीची आहे. अशा वेळेस पंचनाम्यांचे सोपस्कार होत राहतील, परंतु त्याआधी प्रत्येक नुकसानग्रस्त घराला, शेतकऱ्याला 50,000 रुपयांची मदत सरकारने ताबडतोब जाहीर करावी आणि प्रत्यक्षात तत्काळ मदत द्यावी. आधी कोरोना संसर्ग आणि नंतर अतिवृष्टीनं शेतकरी पार कोलमडला आहे अशा वेळी निव्वळ आश्वासनं आणि शब्दांपेक्षा शीघ्र कृतीची गरज आहे."
राज ठाकरेंनी आपल्या पत्रकात पुढे म्हटलं, "प्रशासकीय पातळीवर नंतर पंचनामे होत राहतील. त्यात शेतीच्या नुकसानीबरोबर घरांच्या व पाळीव गुरांच्या नुकसानीचाही विचार होईल आणि रितसर मदत केली जाईल. परंतु मी ज्या काहींशी बोललो त्यानुसार, तोपर्यंत वाट पाहण्याची ताकद आत्ता शेतकरी बांधवांकडे नाही, ह्याचा विचार करावा आणि सत्वर पावलं टाकावीत. तसेच ही परिस्थिती बघता शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी आग्रही मागणी मी ह्या पत्रकाद्वारे राज्य सरकारकडे करत आहे."
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gulabrao patil, MNS, Raj Thackeray, Shiv sena