मुंबई, 16 सप्टेंबर : मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती देण्यात आल्यानंतर राज्यभर संताप व्यक्त करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी मराठा संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. या पार्श्वभूमीवर पुढील दिशा ठरवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक संपली असून लवकरच कायदेशीर बाबी तपासून घटनापीठकडे जाणार, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
'एक मार्ग ठरवण्याच्या जवळ आलो. विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितले आम्ही सरकार सोबत आहोत. मराठा आरक्षणाबाबत गेल्या सरकार काळात देखील सर्व सोबत होतो. त्यांच्या सूचना एकत्र करू. परवा याबाबत निर्णय घेऊ,' असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
'कुठल्या पर्याय बाबत आम्ही आता बोलणार नाहीत. आधी सर्व कायदेशीर सल्ला घेणार आहोत. आंदोलन कधी केलं जातं? सरकार ऐकत नाही तेव्हा. मात्र आम्ही आंदोलकांसोबत आहोत. आंदोलनाचा विचार करा,' असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी आंदोलकांना केलं आहे.
सर्वपक्षीय बैठकीनंतर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
'मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारला सहकार्य करण्याची आमची भावना आहे. राज्य सरकारला आमचा पाठिंबा आहे. आम्हाला याची खंत आहे की, आवश्यकता होती तेव्हा बोलावलं नाही, पण आताही आम्ही सरकरला मदत करण्यास तयार आहोत. मराठा आंदोलन हिंसक होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. महाराष्ट्र शांत कसा राहील, याचं भान ठेवा,' असं भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मराठा आरक्षण लागू करण्यासाठी ठाम भूमिका घेणाऱ्या माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच्या सोबतीने केंद्र सरकारनेही उभे राहावे. सर्वोच्च न्यायालयात केंद्राने मराठा आरक्षणाच्या बाजूने भूमिका घ्यावी आणि वेळ पडल्यास विशेष वटहुकूम काढावा, अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेतील शून्य प्रहरात केली.