मुंबई, 6 जुलै : महाराष्ट्रात सरकार गमावल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये सहभागी असलेल्या काँग्रेसनं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे. ठाकरे यांनी हुशारीनं निर्णय घेतले असते तर सरकार वाचले असते, असं मत काँग्रेसनं व्यक्त केलं आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सरकारनं सोमवारी झालेल्या विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यानंतर राज्यात 15 दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षाचा अंत झाला आहे.
'इकोनॉमिक टाईम्स'नं दिलेल्या वृत्तानुसार तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पद सोडण्याचा सल्ला दिला होता. काँग्रेसच्या सूत्रांनी या वृत्तापत्राला सांगितले की, 'एका वरिष्ठ कॅबिनेट मंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांना राजीनामा देऊन एकनाथ शिंदे यांना पुढील मुख्यमंत्री करावं असा सल्ला दिला होता. शिवसेनेतील बंड शांत होईल, अशी सुरूवातीला चर्चा होती. पण, त्यानंतर काही दिवसांमध्ये शिवसेनेचे बहुसंख्य आमदार आणि मंत्री शिंदे कँपमध्ये दाखल झाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये बोलताना एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव आपण दिला होता, असे स्पष्ट केले. 'एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं पाहिजे, असा प्रस्ताव मी दिला होता. तो प्रस्ताव पक्षाच्या वरिष्ठांनी मान्य केला. फक्त त्यावेळी मी बाहेर राहीन, असंच ठरलं होतं. मात्र ज्यावेळी राज्यपालांना पत्र देवून पत्रकार परिषद झाली ती करुन मी घरी गेलो त्यावेळी नड्डा यांनी मला आधी फोन करून पक्षाचा विचार सांगितला. त्यानंतर अमित शाह बोलले. त्यानंतर माझी तयारी त्यावेळी नव्हती. कारण त्यावेळेस मी मानसिकताही केली होती की, आपण बाहेर राहून या सरकारला मदत केली पाहिजे,' असं फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री आणि शरद पवारांमध्ये मध्यरात्री खलबतं, चर्चांना उधाण
भाजपाकडे 115 आमदार असल्यानं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असा अनेकांचा अंदाज होता. पण, त्यांनी एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री म्हणून घोषणा केली. आपण मंत्रिमंडळाच्या बाहेर राहणार असल्याचं फडणवीस यांनी सुरूवातीला सांगितले होते. पण, भाजपाच्या राष्ट्रीय नेत्यांनी आदेश दिल्यानंतर फडणवीस उपमुख्यमंत्री होण्यास तयार झाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.