मुंबई, 25 मार्च: कोरोनाविरूद्धच्या लढाईत खबरदारीची उपाययोजना म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून राज्यभरात तब्बल 22 हजार 118 खोल्यांची सज्जता करण्यात आली असून, या ठिकाणी 55 हजार 707 खाटांची सोय होऊ शकेल, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
अशोक चव्हाण म्हणाले की, कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर झाले आहे. राज्यातील परिस्थितीत नियंत्रणात आहे. नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. मात्र गरज भासलीच तर राज्य सरकारने सर्व प्रकारची तयारी केली आहे. याच तयारीचा एक भाग म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असलेल्या शेकडो शासकीय इमारतींमधील 22 हजार 118 खोल्या प्रशासनासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये विश्रामगृहे, वस्तीगृहे, नवीन बांधकाम झालेल्या मात्र अद्याप लोकार्पण न झालेल्या शासकीय इमारती आदींचा समावेश आहे. या ठिकाणी वीज, पाणी अशा सुविधा देखील उपलब्ध असतील. या खोल्यांचा वापर विलगीकरण तसेच तात्पुरत्या स्वरूपातील रूग्णालय म्हणून केला जाऊ शकतो.
हेही वाचा..जावई शिंकला, सासरच्या मंडळींनी थेट घराबाहेर खांबाला बांधला! धक्कादायक VIDEO
आपात्कालीन यंत्रणेने यातील अनेक इमारतींचा वापर देखील सुरू केला आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार हे कर्मचारी हवे त्यावेळी उपलब्ध असतील, अशीही माहिती अशोक चव्हाण यांनी दिली.
राज्यात दिवसभरात कोरोनाचे तब्बल 15 नवे रुग्ण, रुग्णांची संख्या 122 वर
महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढली आहे. कोरोनाव्हायरसचे आणखी 6 रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 122 वर पोहोचला आहे. मुंबईमध्ये 5 आणि ठाण्यात एक रुग्ण आढळून आला आहे. दिवसभरात राज्यात कोरोनाव्हायरसचे एकूण 15 रुग्ण आढळून आलेत. सकाळी सांगलीमध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांना व्हायरसची लागण झाल्याचं स्पष्ट झालं.
हेही वाचा...#21दिवस : शहरं लॉकडाउन; गावांचं काय? 'इथे परिस्थिती गंभीर आहे, प्लीज काहीतरी करा
राज्यावर असलेल्या कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी लोकांना दिलासा देण्याचाही प्रयत्न केला आहे. 'जीवनाश्यक वस्तूंची दुकाने उघडे असतील. कोणत्याही वेळा नसणार आहेत. भाजीपाल्याची दुकाने बंद होणार नाहीत. कृपया गर्दी करू नका,' असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
'कोरोनाच्या संकटामुळे अनेक अडचणी येत असल्या तरीही आता तुम्ही सर्व घरी आहात. घरात बसून कुटुंबियांसोबत आनंद घ्या,' असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केलं. तसंच मी घरात बसून काय करतो, असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर मी घरी मिसेस मुख्यमंत्र्यांचं ऐकतो, तुम्हीही तुमच्या होम मिनिस्टरचं ऐका, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.जगभरात आतापर्यंत 18 हजार लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे. तर लाखो लोकांवर सध्या उपचार सुरू आहेत. भारतात जवळपास 500 हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आहेत. धक्कादायक म्हणजे कोरोनानं भारता 11 बळी घेतला आहे.
हेही वाचा...मुसळधार पावसाने महाराष्ट्राला झोडपलं; अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान
कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. 21 दिवस म्हणजेच 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन असणार आहे. पुढचे 21 दिवस कुणालाही घराबाहेर पडता येणार नाही. रस्त्यांवरून विना आयडी फिरणाऱ्यांवर आणि विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. देशात अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवा वगळता सर्व बंद ठेवण्याचे निर्देश केंद्राकडून देण्यात आले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.