मुंबई, 13 मे : काँग्रेसमधील नाराज नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजप नेते आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
राधाकृष्ण विखे पाटील हे गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसवर नाराज आहेत. आजही गिरीश महाजन यांची भेट घेतल्यानंतर दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने दिलेल्या वागणुकीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आधी विखे पाटील मोठा राजकीय निर्णय घेणार का, हे पाहावं लागेल.
दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील यांनी या लोकसभा निवडणुकीत पक्षाविरोधातच रणशिंग फुंकलेलं पाहायला मिळालं. नगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघात त्यांनी आपली ताकद युतीच्या बाजूने उभा केली होती.
नगरमध्ये मुलगा सुजय विखे पाटील यांना काँग्रेसचं तिकीट मिळावं, यासाठी राधाकृष्ण विखे पाटील आग्रही होते. पण आघाडीमध्ये ही जागा राष्ट्रवादीकडे असल्याने सुजय यांना काँग्रेसची उमेदवारी मिळू शकली नाही. त्यानंतर मग सुजय विखेंनी बंडाचा झेंडा उभारत थेट भाजपमध्ये प्रवेश केला.
सुजय विखेंनी जरी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी वडील राधाकृष्ण विखेंनी मात्र फक्त विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देत काँग्रेसमध्येच राहणं पसंत केलं. पण काँग्रेसमध्ये राहूनही प्रत्यक्ष निवडणुकीच्या रणांगणात मात्र त्यांनी नगर आणि शेजारील शिर्डी मतदारसंघातही युतीच्या बाजूनेच आपली ताकद उभी केली. त्यामुळे या दोन्ही जागा विखे पाटलांसाठी प्रतिष्ठेचा विषय झाला आहे.
ममता की मोदी, कोण जिंकणार पश्चिम बंगाल? पाहा हा SPECIAL REPORT