मुंबई, 26 जानेवारी : 'केंद्रातील सरकारने एक पाऊल मागे घेतले असते तर आज राजधानीत प्रजासत्ताक दिनाचे (republic day)संचलन आणि शेतकऱ्यांचा आक्रोश एकाच वेळी दिसला नसता. नोटाबंदी, जीएसटी (GST) आणि लॉकडाउन (Lockdown) यामुळे देशाच्या सर्वसामान्य माणसाच्या मनातही आक्रोश आहेच. आज आपल्या देशाच्या राजधानीत शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. त्याच्या पाठिंब्यासाठी राज्याराज्यांच्या राजधानीतही शेतकऱ्यांचे धडक मोर्चे निघत आहेत. हे चित्र बरे नाही. उद्या हा वणवा आणखीही पसरू शकतो. हे खरेच प्रजासत्ताक आहे का?' असा सवाल शिवसेनेनं (Shivsena) थेट मोदी सरकारला (Modi Goverment) विचारला आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने एकीकडे राजपथावर लष्कराच्या सामर्थ्याचे दर्शन होणार आहे. तर दुसरीकडे गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणारे शेतकरी दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढणार आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडण्यात आले आहे.
' ज्या जनतेचे हे ‘प्रजासत्ताक’ आहे त्या जनतेचे अनेक प्रश्न 72 व्या प्रजासत्ताक दिनीही कायमच आहेत. मागील सात दशकांत देशाची प्रगती नक्कीच झाली. त्या प्रगतीचे लाभ जनतेलाही झालेच, पण ते किती लोकांना झाले? कोणत्या वर्गाला झाले? मागील तीन दशकांत देशात एक ‘नवश्रीमंत’ वर्ग निर्माण झाला. ‘करोडपतीं’चीही संख्या वाढली, पण गरीब अधिक गरीब झाला हेदेखील खरेच. देशातील शेतकरी आणि सामान्य जनता जेथे सुखी आणि सुरक्षित असते तो देश खरा प्रजासत्ताक म्हणता येतो. आपल्या देशाला खरेच तसे म्हणता येईल का? पुन्हा या प्रश्नांची उत्तरे ज्यांनी द्यायची ते नेमके अशा प्रश्नांवर काहीच बोलत नाहीत. त्यांच्या ‘मन की बात’मध्ये हे ज्वलंत मुद्दे येत नाहीत' असं म्हणत शिवसेनेनं थेट पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.
'आज देशाच्या राजधानीत प्रजासत्ताक दिनाचे संचलनही होईल आणि कृषी कायद्यांविरोधात आक्रोश करणाऱ्या शेतकऱयांची ‘ट्रॅक्टर रॅली’देखील. केंद्र सरकारने मनात आणले असते तर ती सहज टळू शकली असती. मागील 50-60 दिवसांपासून हे शेतकरी दिल्लीच्या गारठवणाऱ्या थंडीत आंदोलन करीत आहेत. मात्र चर्चेच्या गुऱ्हाळापलीकडे काहीही घडलेले नाही. शेतकऱ्यांसोबत चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. तशाच चिन्यांसोबतही, पण त्यातून निष्पन्न काहीच होणार नसेल तर कसे व्हायचे? असा सवालही सेनेनं विचारला आहे.
'हिंदुस्थान-चीन सीमेवरदेखील अशाच चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. मात्र तेथेही तणाव कमी होण्याची चिन्हे नाहीत. किंबहुना, चिनी सैनिकांची घुसखोरी आणि चिन्यांच्या कुरघोड्या सुरूच आहेत. नेपाळपाठोपाठ अरुणाचल प्रदेश सीमेवर चिन्यांनी ‘कृत्रिम’ गाव वसविल्याचे उघड झाले आहे. गलवान खोऱ्यात जशी रक्तरंजित झटापट चिनी आणि हिंदुस्थानी सैनिकांत झाली होती तशी झटापट आता प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सिक्कीम सीमेवरील के ना कुला पासवर झाली. आपल्या बहादूर सैनिकांनी चिन्यांना पिटाळून लावले हे खरे असले तरी हे थांबणार कधी? या प्रश्नाचे उत्तर देशाला मिळणार आहे का? असा सवालही मोदी सरकारला विचारण्यात आला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Republic Day