मुंबई, 3 जुलै : महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेतील पुढचा टप्पा शासनाकडून वितरित करण्यात आला आहे. याअंतर्गत 2334 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. त्यामुळे राज्यभरातील तब्बल तीन लाख 53 हजार शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.
कोरोनाचं संकट राज्यात धडकल्यानंतर अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला. या पार्श्वभूमीवर कर्जमाफीस पात्र असलेल्या शेतकऱ्यांनाही फटका बसला होता. मात्र आता कर्जमाफीचा उरलेला टप्पा पुन्हा पुरवला गेला आहे.
कशी झाली होती राज्यात कर्जमुक्ती योजनेची घोषणा?
शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना राज्य सरकारने जाहीर केली होती. यात 20 हजार 250 कोटीची कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी करण्यात आली आहे. त्यात 30 लाख 40 हजार शेतकरी पात्र ठरले. पहिल्या तीन टप्प्यांमध्ये 19 लाख शेतकऱ्याच्या खात्यात निधी जमा करण्यात आला आहे. कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडल्याने सलग रक्कम देता आली नव्हती. उर्वरित 11 लाख शेतकऱ्यांपैकी 30 जून रोजी 1 लाख 34 हजार शेतकऱ्यांसाठी शासनाने रु. 1050 कोटी वितरित केले आहेत. आज उर्वरित 2334 कोटी रुपयांची रक्कम 3.53 लाख शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे.
संपादन - अक्षय शितोळे