18 एप्रिल : पुढच्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने राज्यात विकासकामांचा धडाका लावला आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईच्या पूर्व किनाऱ्याचाही विकास करण्यात येणार असून दुबईतील ‘बुर्ज खलिफा’सारख्या 3 भव्य वास्तू मुंबईत उभारण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी काल (सोमवारी) केली आहे.
त्याचबरोबर, मुंबई-गोवा महामार्गाचं काम 2019 पर्यंत म्हणजे पुढच्या दोन वर्षात पूर्ण करण्यात येणार असल्याचं निर्धारही त्यांनी व्यक्त केली आहे. त्यासाठी लागणाऱ्या 11 हजार 747 कोटी रूपयांचा निधीही मंजुर करण्यात आलाय. हा संपूर्ण मार्ग हरित महामार्ग म्हणून विकसित करण्यात येणार आहे.
केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा निर्णय जाहीर करण्यात आला.
मुंबईच्या पश्चिम किनारपट्टीप्रमाणे पूर्व किनारपट्टीचाही विकास करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यानुसार या किनाऱ्यावर चौपाटी विकसित करण्यात येणार असून दुबईतील बुर्ज खलिफासारखी भव्य वास्तू उभारण्यात येणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडण्यात आल्याची माहिती गडकरी यांनी दिली.
विशेष म्हणजे मुंबई-गोवा महामार्ग हा हरित महामार्ग म्हणून विकसित केला जाणार आहे. एवढच नाही तर राज्यातले सर्व प्रमुख रस्ते प्रकल्पही पुढच्या दोन वर्षात पूर्ण केले जातील. त्यात मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-गोवा कोस्टल रोड, पुणे -सातारा महामार्ग, समृद्धी महामार्ग, पंढरपूरला जाणारे दोन्ही पालखी महामार्ग अशा प्रमुख मोठ्या रस्त्यांचा समावेश आहे.
मुंबई पोर्ट ट्रस्टची साडेसातशे हेक्टर जमीन पूर्व किनाऱ्याला लागून आहे. त्यामुळे या किनाऱ्यावर सध्याच्या मरिन ड्राइव्हपेक्षा तीनपट मरीन ड्राइव्ह विकसित करण्यात येणार आहे. पर्यटन दृष्टिकोनातून या किनारपट्टीचा विकास करण्यात येणार असून तेथे कन्व्हेन्शन सेंटर्स, हॉटेल्स उभारण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
गडकरी-पाटलांच्या मुख्य घोषणा