मुंबई ,23 नोव्हेंबर : एल्फिन्स्टन पुलाच्या प्राथमिक कामाला आज लष्कराने सुरूवात केली आहे.31 जानेवारीपर्यंत काम पूर्ण करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी दिलं होतं.
आता नव्या पुलामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबईतल्या परळ-एलफिन्स्टन रेल्वे पुलावर चेंगराचेंगरीची मोठी दुर्घटना घडली होती. आणि या घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला होता. पूल कोसळल्याच्या अफवेमुळे प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी धावाधाव केली आणि यामुळे चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली होती. त्यानंतर नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी सरकारने नवीन फूट ओव्हर ब्रिजचा प्रस्ताव मांडला. एल्फिन्स्टन फूट ओव्हर ब्रिज एलफिन्स्टन स्थानकावरील फूट ओव्हर ब्रीज बांधण्याची जबाबदारी त्यानंतर भारतीय सैन्याकडे दिली गेली. मुख्यमंत्री फडणवीस, रेल्वेमंत्री पियुष गोयल, संरक्षणमंत्री निर्मला सितारमन यांनी एलफिन्स्टन पूलाची पाहणीही केली होती. आणि आता या एलफिन्स्टन ब्रिजच्या कामाला लष्करानं सुरुवात केलीय.
या पुलाची बांधणी झाल्यानंतर तरी आता वर्दळीचा प्रश्न सुटतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा