मुंबई, 8 फेब्रुवारी : भारतातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या आंतरराराष्ट्रीय सेलेब्रिटींना भारतातील सेलेब्रिटींनी ट्वीट करत उत्तर दिलं. क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यासह अनेकांवर ट्वीट करण्यासाठी मोदी सरकारने दबाव टाकल्याचा आरोप होत आहे. याप्रकरणी आता राज्य सरकारकडून चौकशीचे संकेत देण्यात आले. या संपूर्ण घटनाक्रमामुळे भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे चांगलेच आक्रमक झाले आहेत.
'संतापजनक...कुठे गेला मराठीबाणा? कुठे गेला महाराष्ट्रधर्म? भारतरत्नांची चौकशी करणारे असे ‘रत्न’ देशात कुठेही सापडणार नाहीत.
निषेध करावा तितका थोडा...या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?' असा आक्रमक सवाल करत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर हल्ला चढवला आहे.
'भारतरत्नांची चौकशी करण्याची भाषा वापरताना शरम वाटली पाहिजे. खरंतर चौकशी करण्याची मागणी करणारे आणि ती मागणी मान्य करणारे यांच्या मानसिक स्थितीचीच चौकशी केली पाहिजे,' अशी खरमरीत टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
भारतरत्नांची चौकशी करण्याची भाषा वापरताना शरम वाटली पाहिजे. खरे तर चौकशी करण्याची मागणी करणारे आणि ती मागणी मान्य करणारे यांच्या मानसिक स्थितीचीच चौकशी केली पाहिजे.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 8, 2021
चौकशीप्रकरणी काय म्हणाले गृहमंत्री अनिल देशमुख?
'कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर गेल्या 70 दिवसांपासून आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांच्या मुद्यावर देशातील सेलिब्रेटीजचा केंद्रसरकारने गैरवापर केल्याप्रकरणी महाराष्ट्र काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मला चौकशी करण्याचे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे निवेदन दिले. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत जी यांनी या गंभीर विषयावर माझ्याशी चर्चा केली. कोरोनाची बाधा झाली असतानाही शेतकऱ्यांचा विषय असल्याने मी त्यांना भेटीची वेळ दिली. त्यांचे म्हणणे ऐकून घेत या विषयावर नियमांनुसार कारवाई करण्याचे आश्वासन त्यांना दिले,' अशी माहिती ट्विटरवरून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Devendra Fadnavis, Farmer protest, Sachin tendulkar, Tweet