मुंबई, 08 जानेवारी : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackery) यांनी आज विदर्भातील विकासकामांची पाहणी केली. गोसीखुर्द प्रकल्पासह (gosikhurd project) इतर प्रकल्पांचीही त्यांनी पाहणी केली. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावर भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी 'राज्य सरकारने जाहीर केलेल्या मदतनिधीवर 'उधार'राजाचे जाहीर आभार' असे म्हणत बोचरी टीका केली.
'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अधिवेशन वगळता 14 महिन्यातील आज पहिला नागपूर दौरा आहे. या दौऱ्यापूर्वी कालच शेतकऱ्यांच्या अंतिम मदतीचा जीआर जारी करण्यात आला आहे. पूर्व विदर्भातील 6 जिल्ह्यातील सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रचंड अशी 11 कोटी रुपयांची मदत त्यांनी जाहीर केली', असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
मा. मुख्यमंत्री यांचा अधिवेशन वगळता १४ महिन्यातील आज पहिला नागपूर दौरा या दौऱ्यापूर्वी कालच शेतकऱ्यांच्या अंतिम मदतीचा जीआर जारी करण्यात आला. पूर्व विदर्भातील ६जिल्ह्यातील सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रचंड अशी 11 कोटी रुपयांची मदत त्यांनी जाहीर केली. ‘उधार‘राजाचे जाहीर आभार!
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 8, 2021
'ठाकरे सरकारने जाहीर केलेल्या मदतीबद्दल ‘उधार‘राजाचे जाहीर आभार' असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला आहे.
तर दुसरीकडे विदर्भात जाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाणे स्वागतहार्य आहे. पण फक्त दौरा करुन चालणार नाही तर गोसीखुर्द सहित विदर्भाच्या विकासासाठी निधी दिला पाहिजे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना अनेक निर्णय घेतले होते. त्या निर्णयांना निधी देण्याची गरज आहे. पक्ष कोणताही असला तरी चालेल पण विदर्भाचा विकास हा महत्त्वाचा आहे', असं मत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्र्यांनी थांबवला ताफा
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज विदर्भाच्या दौऱ्यावर आहे. सकाळी त्यांनी गोसीखुर्द धरणाची पाहणी केली होती. त्यानंतर चंद्रपूरमधील घोडाझरी कालव्याची पाहणी करण्यासाठी पोहोचले. यावेळी स्थानिक शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
माझं शोषण होतंय, आता तुमची वेळ', अभिनेत्री कंगना रणौतनं शेअर केला VIDEO
कालव्याची पाहणी करून मुख्यमंत्र्यांचा ताफा जात असताना रस्त्याच्या बाजूला शेतकरी-प्रकल्पग्रस्तांची गर्दी होती. ती पाहून खुद्ध मुख्यमंत्री ठाकरे यांनी गाडी थांबवली आणि उतरून शेतकऱ्यांशी संवाद साधला. गेली 35 वर्षे शेतीला पाणी मिळत नसल्याची तक्रार प्रकल्पग्रस्तांनी केली, हजारो कोटी रुपये खर्चून शेती तहानलेली असल्याची खंत शेतकऱ्यांनी मांडली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी निवेदन स्वीकारत योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले. परंतु, अचानक ताफा थांबवून शेतकऱ्यांनी गाऱ्हाणे मांडल्याने पोलीस प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली होती.
गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प येत्या तीन वर्षात पूर्ण करा - उद्धव ठाकरे
दरम्यान, मुख्यमत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील विकासकामांच्या आढाव्याची सुरुवात विदर्भापासून केली आहे. गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प येत्या तीन वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन करावे, निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.
औरंगाबाद शहराच्या नामांतरावर उदयनराजेंनी दिला सल्ला, म्हणाले....
'प्रकल्प पूर्ण करतानाच या प्रकल्पामुळे बाधित झालेल्या नागरिकांचे योग्य पुनर्वसन व्हावे तसेच पुनर्वसन पूर्ण झाल्यावर त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडविण्यासाठी रोजगार निर्मितीचे प्रकल्प सुरू करण्याला प्राधान्य देणे आवश्यक आहे', असंही मुख्यमंत्री म्हणाले.
'गोसीखुर्द प्रकल्प यापुढे न रखडता सर्व घटकांच्या सहकार्याने डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण झाला पाहिजे. यासाठी आवश्यक असलेल्या निधीचे नियोजन करावे. हा प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करून विदर्भातील जनतेस सिंचनासाठी मोठा लाभ मिळवून देण्यात येईल', अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.