मुंबई 19 एप्रिल: मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. आज दिवसभरात कोरोनाचे 135 रुग्ण आढळून आलेत तर 6 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या 2798वर गेली आहे. तर आत्तापर्यंत 131 जणांचा मृत्यू झालाय. आज 29 जण बरे होऊन घरी गेलेत. त्यामुळे आत्तापर्यंत डिस्चार्ज मिळालेल्यांचा आकडा 310वर गेला आहे. मृतांमध्ये आज एका 26 वर्षीय महिलाचाही समावेश आहे. तिला थायरॉईडचा त्रास होता अशी माहिती दिली जात आहे. म्हणजे फक्त वृद्ध नाही तर तरुणांना काही आधीच वेगळे आजार असतील आणि करोना झालं तर ते धोकादायक ठरू शकतं हे समोर आलं आहे.
ठाण्यात आज 19 नवीन करोना बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे ठाण्यातल्या रुग्णांची संख्या 149 एवढी झाली आहे. तर आत्तापर्यंत दोघांचा मृत्यू झालाय.
धारावी हे कोरोनाचं हॉटस्पॉट झालं आहे. दररोज रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे. ही वाढ रोखण्यासाठी प्रशासनाने पूर्ण ताकद लावली आहे. मात्र दाट वस्ती आणि प्रचंड लोकसंख्येमुळे या भागात कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. आज धारावीत 20 नवे रुग्ण सापडले. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या 138 वर गेली आहे. तर आत्तापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. आज ज्या रूग्णांची नोंद झाले ते 60 फुटी रोड, कल्यानवाडी, शिवशक्ती नगर, बाबा मस्जिद, सानुला कंपाऊंड, राजीव गांधी चाळ, मुकुंद नगर भागात आढळून आले आहे.
देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. गेल्या24 तासांमध्ये COVID19चे 1334 रुग्ण आढळले. तर 24 जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे बाधितांची संख्या 15712 तर मृतांचा आकडा 507 वर गेला आहे. पाँडेचेरी इथल्या माहे आणि कर्नाटकमधल्या कोडगू जिल्ह्यात गेल्या 28 दिवसांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही अशी माहिती केंद्रीय आरोग्य विभागाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे.
23 राज्यांमधल्या 54 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसांपासून एकही रुग्ण आढळला नाही. आत्तापर्यंत 2,231 रुग्ण बरे झाले आहेत. आत्तापर्यंत 3,86,791 एवढ्या टेस्ट करण्यात आल्या आहेत अशी माहिती ICMRचे रमण गंगाखेडकर यांनी दिली.
(संपादन - अजय कौटिकवार)