मुंबई, 26 डिसेंबर : 'ज्या ठिकाणी भाजप विरोधात सरकार आहे. त्या ठिकाणी भाजपकडून (BJP) त्रास दिला जात आहे. त्यामुळे या तानाशाही विरोधात देशातील सर्व पक्षांनी एकत्र आलं पाहिजे. डावे आणि उजवे असलेल्या पक्षांनी एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे', असं आवाहन शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे. तसंच 'आज देशामध्ये सोनिया गांधी यांच्यानंतर शरद पवार यांच्या नेतृत्वाला मान्यता आहे. त्यामुळे त्यांचा नावाचा विचार करू शकतो', असं मतही राऊत यांनी व्यक्त केले.
मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखावर आपली परखड भूमिका मांडली. यावेळी त्यांनी सर्व पक्षांना मोदी सरकारविरोधात एकत्र येण्यासाठी आवाहनही केले.
पुणे-सोलापूर महामार्गावर 'बर्निंग बस'चा थरार, LIVE VIDEO
'मोदी सरकार हे बहुमतात आहे. मोदी यांचं नेतृत्व हे मजबूत आहे. ज्या ठिकाणी भाजपचे सरकार नाही. त्याठिकाणी मोदी सरकारकडून अडवणूक केली जात आहे. सरकारी यंत्रणाचा वापर करून दबाव टाकला जात आहे. त्यामुळे मोदी सरकारविरोधात उभं राहण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचं आहे. आज यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी आहेत. सोनिया यांनी आतापर्यंत मोठ्या हिंमतीने पक्ष सांभाळला आहे. यूपीएची कमान त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे. पण, आता यूपीएची ताकद वाढणे गरजेचं आहे. यूपीएमध्ये अनेक पक्षांनी आले पाहिजे. जी काही तानाशाही सुरू आहे. त्याविरोधात आवाज उठवला पाहिजे' असं राऊत म्हणाले.
'एनडीए हा खाली माचिसचा डबा आहे. अकाली दल सुद्धा एनडीएमधून बाहेर पडला आहे. आता जसे वातावरण तयार झाले आहे, पुढे चालून नितीशकुमार सुद्धा एनडीएमधून बाहेर पडतील' अशी शक्यताही राऊत यांनी बोलून दाखवली.
कारचं बोनेट उघडलं आणि चालकाची बोबडीच वळली, नेमकं काय घडलं पाहा थरारक VIDEO
शरद पवार यांनी यूपीएचे नेतृत्व करावे का? असा सवाल पत्रकारांनी विचारला असता राऊत म्हणाले की, आज देशामध्ये सोनिया गांधी यांच्यानंतर शरद पवार यांच्या नेतृत्वाला मान्यता आहे. त्यामुळे त्यांचा नावाचा विचार करू शकतो.'
शिवसेनेच्या आमदारांना ईडीने नोटीस बजावली होती. आता एकनाथ खडसे यांनाही नोटीस पाठवण्याचे ऐकायला मिळत आहे. जो नेता आपल्याविरोधात आहे, त्याच्याशी सामना करू शकत नाही. अशा नेत्यांविरोधात ईडीचा वापर केला जात आहे, अशी टीकाही राऊत यांनी केली.