14 जानेवारी : 'युतीवर तोडगा काढण्यासाठी आम्ही समर्थ असून चिंता करण्याची गरज नाही', असं विधान खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. विशेष म्हणजे, या कार्यक्रमामध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थितीत होते.
'ठाकरे' सिनेमासाठी आयोजित ‘बाळासाहेबांना मानाचा मुजरा’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची सुधीर गाडगीळ यांनी एकत्र मुलाखत घेतली.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरे हयात असताना युतीच्या आठवणींना उजाळा दिला. 'बाळासाहेबांच्या मनाच्या मोठेपणामुळं युती नेहमीच टिकली. भाजपकडून युती टिकवण्याची जबाबदारी प्रमोद महाजन यांनी यशस्वीरित्या सांभाळली आणि आता युतीची जबाबदारी आमच्यावर असून आम्ही समर्थ आहोत', असं विधान फडणवीसांनी केलं आहे.
एकीकडे उद्धव ठाकरेंकडून विखारी टीका होत असताना मुख्यमंत्र्यांनी केलेलं हे विधान महत्त्वाचं मानलं जातं आहे.
दरम्यान, मागील आठवड्यात भाजपच्या कार्यकारणीला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेले होते. तेव्हा त्यांनी शिवसेनेसोबत चर्चा सुरू असल्याचे संकेत दिले होते. 'उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली आहे, त्यानंतर अमित शहांसोबतही चर्चा झाली', असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. युतीचा निर्णय मुंबईत होईल असंही ते म्हणाले होते.
==================