विरार,22 एप्रिल : नालासोपारा पूर्वेकडील तुळींज रुग्णालयाला कोविड रुग्णालय बनवण्यास नागरिकांनी विरोध केला आहे. तसंच या प्रक्रियेला भाजपनंही तीव्र विरोध केला आहे. एकाचे प्राण वाचवायचे तर दुसऱ्याच्या जीवाशी खेळायचे हा कुठला न्याय? असा सवाल वसई विरार जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष मनोज बारोट यांनी केला आहे. नालासोपारा पूर्वेतील विजयनगर स्थित रुग्णालयास कोविड सेंटर बनविण्याच्या आयुक्तांच्या निर्णयाचा त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
(वाचा-बेड मिळाला नाही म्हणून झाडाखाली घेतला आसरा; पत्नीसमोरचं सोडला जीव)
वसई विरार महापालिका परिसराची लोकसंख्या सुमारे 28 लाख एवढी आहे. त्यापैकी 50 टक्के मजूर, कष्टकरी आणि गरीब वर्गातील नागरिक आहेत. तसंच या कोरोना महामारीच्या काळात मध्यमवर्गीय किंवा श्रीमंत यांची परिस्थितीही जवळपास सारखीच आहे. त्यामुळं मनपा आयुक्तांचा हा निर्णय सर्वसामान्य नागरिक आणि पोलिस प्रशासनासाठी त्रास वाढविणारा ठरेल असा आरोप बारोट यांनी केला आहे. विजयनगर येथील रुग्णालयात दरमहा 100 हून अधिक रुग्ण डायलिसिस करतात. तर दररोज अंदाजे 300 गरीब रूग्णांची ओपीडी असते. जर या रुग्णालयाला कोविड रुग्णालयात रुपांतरीत केलं तर या सर्व रुग्णांची व्यवस्था कुठं करणार असा सवालही नागरिकांनी मांडला आहे.
(वाचा-महाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी, कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ)
तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता हॉस्पिटल आणि बेडची संख्याही वाढवणं गरजेचं आहे. पण त्याचबरोबर रुग्णांच्या नियमित आरोग्य समस्यांसाठी रुग्णालयही गरजेचं आहे. त्यामुळं मनपा प्रशासनानं ओपीडी सेंटर बंद करण्याऐवजी किंवा तिथं संपूर्ण कोविड सेंटर बनवण्याऐवजी या भागात बरीच मोठी महाविद्यालये आणि धार्मिक स्थानं आहेत तिथे कोविड सेंटर सुरू करावं, असा सल्ला बारोट यांनी दिला.
विजयनगरमधील रुग्णालय बंद केले तर याठिकाणच्या रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल. शिवाय एकाचा प्राण वाचवताना दुसऱ्याच्या जीवाशी खेळ होईल असे होऊ नये असे मनोज बारोट म्हणतात. या गंभीर विषयावर विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा अशी विनंती त्यांनी मनपा प्रशासनाला केली आहे.