अक्षय कुडकेलवार, प्रतिनिधी
मुंबई, 23 ऑक्टोबर : उद्धव ठाकरे अयोध्येत जाणार, त्यासाठी शुभेच्छा आहेत मात्र शिवसेनेचा देव बाळासाहेब आहे. महापालिकेत त्यांची सत्ता असताना बाळासाहेबांच्या स्मारकावर जास्त लक्ष द्यावं असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी लगावला आहे. ते मुंबईत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते.
विकासाचा मुद्दा आता अंगाशी आल्याने राम मंदिराचा मुद्दा पुढे येत आहे असल्याची टीकाही त्यांनी शिवसेनेवर केली. राम मंदिराचा मुद्दा न्यायलयात प्रलंबीत असताना जर राजकारण होत असेल तर मग न्यायदेवतेवर तुमचा विश्वास नाही असं समजावे लागेल असंही ते म्हणाले.
दरम्यान, जर राम मंदिर बांधणं शक्य होतं तर चार वर्षात का बांधलं गेलं नाही असा सवालही त्यांनी या कार्यक्रमात उपस्थित केला. शिवसेनेला लोकशाहीत डबल ढोलकी वाजवता येणार नाही, सत्तेत राहून विरोधकांची जागा घेऊ नये. सत्ता सोडून मैदानात यावं असा इशाराही भुजबळांनी शिवसेनेला दिला.
तर शिवसेनेनं लावून धरलेल्या राम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर अनेकांनी टीका केली. हे सरकार राम मंदिराच्या मुद्द्याला हाताशी धरून दुष्काळाच्या मुद्द्याला बगल देत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. काँग्रेसनंतर आता भाजप आणि शिवसेना सारखेच असल्याचंही राज ठाकरे यांनी सांगत महाराष्ट्रात दुष्काळ आहे आणि सेनेला राम मंदिर आठवतं असा टोला लगावला होता.
उद्धव ठाकरे काय बोलतात, तेच कळत नाही. शिवसेनेची भूमिका ही नाटकी असून राजीनामा देण्याची नेहमी धमकी देतात. मात्र पैशाची कामं पूर्ण झाली की शिवसेना आपले राजीनामे खिशात ठेवते असा आरोपही राज ठाकरे यांनी शिवसेनेवर केला.
VIDEO: मुलांचे रेल्वे स्टंट तर तुम्ही पाहिलेच असतील पण आता मुलींचा रेल्वे स्टंट पाहून तुम्ही थक्क व्हाल