मुंबई, 06 डिसेंबर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, ज्ञानसूर्य, महामानव, भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 64 व्या महापरिनिर्वाण दिन (BR Ambedkar 64th Death Anniversary ). महाराष्ट्रासह देशभरातील अनुयायी बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करत आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे (NCP) नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनीही #LetterToBabasaheb या मोहिमेत सहभागी होऊन बाबासाहेबांना पत्राद्वारे अभिवादन केले.
बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी 6 डिसेंबरला लाखोंचा जनसागर चैत्यभूमीवर येत असतो. मात्र, कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे चैत्यभूमीवर न येण्यास अनुयायांना आवाहन करण्यात आले होते. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी #LetterToBabasaheb ही मोहिम राबवण्यात आली आहे. या मोहिमेत जयंत पाटील यांनीही सहभाग घेऊन चैत्यभूमीला एक पत्र लिहिले आहे.
"प्रिय बाबासाहेब,
देशभरातील कोरोनाचे संकट कमी झाले नसल्याने यंदा आम्ही घरूनच आपल्याला अभिवादन करत आहोत.तुम्ही घालून दिलेल्या विचारांचं आजही आम्ही पालन करत आहोत म्हणून देश हितासाठी आपल्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर गर्दी न करण्याच्या सरकारच्या आवाहनला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त #LetterToBabasaheb या मोहिमेत सहभागी होऊन बाबासाहेबांना पत्राद्वारे अभिवादन केले.#DrBRAmbedkar #6december#महापरिनिर्वाण_दिवस pic.twitter.com/PtIE2AjPzZ
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) December 6, 2020
आमचे सरकार संत गाडगेबाबांच्या विचारांनी प्रेरित आहे. इथल्या रंजल्या गांजलेल्यांच्या उन्नतीसाठी, उपेक्षित, वंचितांच्या प्रगतीसाठी आम्ही सदैव कार्यरत राहू. महाराष्ट्राचा वारसा असलेल्या पुरोगामी विचारांना तडा न जाऊ देता समता, न्याय, बंधुता या मूल्यांचे आम्ही रक्षण करू.
चैत्यभूमी ही आम्हा सर्वांचीच उर्जास्त्रोत आहे, इथली माती आम्हाला नेहमीच उर्जा देत राहील याचा मला विश्वास आहे." असं म्हणत जयंत पाटील यांनी बाबासाहेबांना विनम्र अभिवादन केलं.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चैत्यभूमीवर जाऊन वाहिली आदरांजली
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी मुंबईतील दादर येथे चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन केले. डॉ. बाबासाहेबांनी दिलेला एकता, समता, बंधुता, सर्वधर्मसमभावाचा विचारच देशाला व समाजाला पुढे घेऊन जाणार आहे. या विचारांवर चालण्याचा आपण सर्वांनी पुनर्निर्धार करुया, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, ज्ञानसूर्य, महामानव, 'भारतरत्न' डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील दादर येथे चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन केलं. pic.twitter.com/S0yrWaCeRH
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) December 6, 2020
डॉ. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त त्यांच्या कार्याचं, विचारांचं स्मरण करुन उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, डॉ. बाबासाहेबांनी आपल्याला ‘शिका आणि संघटीत व्हा’ अशी शिकवण दिली. समाजातील प्रत्येक व्यक्तीला मान, सन्मान, न्याय, व्यक्ती-अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मतदानाचा हक्क व समानतेची वागणूक देणारी राज्यघटना दिली. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक विविधता असलेल्या आपल्या देशाला एकसंध, एकजूट, सार्वभौम ठेवण्याचं संपूर्ण श्रेय भारतीय राज्यघटनेला आणि बाबासाहेबांच्या दूरदृष्टीला असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.
डॉ. बाबासाहेबांनी दिलेली राज्यघटना व राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांचं संरक्षण करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य असून त्यासाठी सर्वांनी दृढसंकल्प होऊ या, असे उपमुख्यमंत्री म्हणाले. चैत्यभूमीवर दरवर्षी लाखोंच्या संख्येने येणाऱ्या बंधू-भगिनींनाही उपमुख्यमंत्र्यांनी वंदन केले आहे. कोरोना संकटामुळे यंदा या अनेकांनी आपापल्या घरुनंच डॉ. बाबासाहेबांना अभिवादन केल्याबद्दल त्यांचेही उपमुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहे.