मुंबई, 16 मे : राष्ट्रवादीचे दिग्गज नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता भाजपकडून त्यांना विधानपरिषदेवर पाठवण्यात आलं आहे. राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेलेल्या आणि आमदार झालेल्या रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी शरद पवारांसह अजित पवार यांच्यावरही भाष्य केलं आहे.
'आमच्या विकासांच्या मुद्यांना राजकीय वळण दिलं गेलं. आमचा कोणाशीही वैयक्तिक वाद नाही. पक्ष जी जबाबदारी देईल ते काम करेल . शरद पवारांबाबत जी पक्षाची भूमिका असेल तीच माझी भूमिका असेल. पाणी या विषयावर प्रामुख्यानं काम करायचं आहे. माझे अजित पवार किंवा इतर कोणाशीही वैयक्तिक वाद नाहीत, काही विषयावरुन मतभेदामुळे राष्ट्रवादीतून बाहेर पडलो,' असं रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी म्हटलं आहे.
'मी भाजपात प्रवेश करताना अटी-शर्ती घातल्या नव्हत्या. मला शेवटच्या टप्प्यात उमेदवारीचं सांगण्यात आलं. कृष्णा भीमा स्थिरीकरणासंदर्भात घेतलेल्या भूमिकेमुळे, पाण्याच्या विषयामुळे वाद झाला. विजयसिंह मोहितांना विरोध केला गेला. आम्ही पुढील अधिवेशनाच्या वेळी हा मुद्दा आणणार आहोत, त्यावेळेस कोण विरोध करतंय ते सगळ्यांना कळेलच,' असं म्हणत रणजीतसिंह यांनी राष्ट्रवादीला टोला लगावला.
खडसेंच्या नाराजीवर काय म्हणाले?
'कोणत्याही राजकीय नेत्याची कागदपत्रं कायम तयार असतात. माझ्या उमेदवारीमुळे कोणी नाराज असेल तर याबद्दल किंवा त्यांच्याऐवजी मला उमेदवारी का दिली हे मी सांगू शकणार नाही, हा पूर्णपणे पक्षाचा निर्णय आहे,' असं मोहिते पाटील म्हणाले आहेत.
संपादन - अक्षय शितोळे