मुंबई, 30 नोव्हेंबर : 'शिवसेना ही ओवीसींपेक्षा सेक्युलर बनन्याचा प्रयत्न करत आहे, तर आगामी काळात शिवसेना खांद्यावरील भगवा सोडून हिरवा झेंडा हातात घेईल, बाळासाहेबांचे हिंदुत्व यांनी कधीच संपवले आहे. आगामी दसरा मेळाव्याला जय भवानी जय शिवाजी ऐवजी नवीन नारे दिले जातील,' असं भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका केली आहे.
अतुल भातखळकर यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केला. 'ईडी आणि सीबीआयला सीमेवर पाठवा असले विनोदी सल्ले देणे आमचे काम नाही, या पेक्षा घरी बसलेल्या मुख्यमंत्र्यांना मंत्रालयात पाठवा. त्यामुळे निदान जनतेचे काम तरी होईल,' असा प्रतिहल्ला संजय राऊत यांच्या वक्तव्यावर अतुल भातखळकर यांनी केला आहे. तसंच मराठा आरक्षण या सरकारला टिकवायचे नाही, अस म्हणत अतूल भातखळकर यांनी महाविकास आघाडी असा उल्लेख न करता महाभकास आघाडी असा या सरकारचा उल्लेख केला आहे.
'राज्य स्थापन झाल्यापासून राज्याने पहिले असे मुख्यमंत्री पाहिले जे मंत्रालयात गेलेच नाहीत, एकही निर्णय या मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या हिंमतीवर केलेला नाही, एकाही कोविड सेंटरला भेट न देणं आणि जनतेला न भेटणं हा विक्रम सुद्धा मुख्यमंत्र्यांनी केला आहे. तसंच विठ्ठलाच्या पूजेचे तीर्थ हातावर न घेणं आणि विठ्ठलाच्या मुर्तीला स्पर्श न करणं हा विक्रम सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या खात्यावर येतो. मराठा आरक्षणाचा मुद्दा सोडवता आला नाही, राज्याला कोविड कॅपिटल बनवले, कोविडच्या काळात सर्वात जास्त मृत्यू दर वाढवण्याचे काम असेल की कोविडच्या काळात बोल्या लावून बदल्या करण्याचे काम असेल... असे अनेक दुष्कर्म या सरकारच्या काळात झालेले आहेत,' अशी खरमरीत टीका भातखळकर यांनी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.