मुंबई, 28 जून : 'देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते आहे. त्यांच्याकडे 106 आमदारांचं बळ आहे. इतका मोठा आमदारांचा गट महाराष्ट्रात कधी निर्माण झाला नाही. हा गट महाराष्ट्राला पुढे नेऊ शकतो, ही आमची कायम भूमिका आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये तशी क्षमता आहे. त्यांनी या डबक्यात उतरू नये' असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मित्र म्हणून सल्ला दिला आहे. त्यांच्या नरमाईच्या भूमिकेमुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
एकनाथ शिंदे गटाने बंड पुकारल्यानंतर संजय राऊत यांनी मैदानात उतरून चांगलाच दांडपट्टा चालवला. राऊत यांनी शिंदे गटावर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. आता ईडीची नोटीस आल्यामुळे अचानक राऊतांचा सूर बदलला आहे.
देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते आहे. त्यांच्याकडे 106 आमदारांचं बळ आहे. इतका मोठा आमदारांचा गट महाराष्ट्रात कधी निर्माण झाला नाही. हा गट महाराष्ट्राला पुढे नेऊ शकतो ही आमची कायम भूमिका आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये ही क्षमता आहे. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहे. पण त्यांनी आता जे डबकं झालं आहे, त्यांनी यात उतरू नये, एक मित्र म्हणून त्यांना सांगणं आहे. ज्या पद्धतीने डबकं तयार केलं आहे, डबक्यात बेडूक राहतात. फडणवीस जर त्यात उतरले तर भाजपची आणि पंतप्रधान मोदींची कमालीची अप्रतिष्ठा होईल, त्यात कुणी उडी मारणार नाही, असा सल्लाच राऊत यांनी फडणवीसांना दिला.
'एकनाथ शिंदे हे आता ही येऊ शकतात. एकनाथ शिंदे हे अजूनही कार्यकारणीमध्ये आहे. उद्धव ठाकरे यांनीच त्यांना पक्षाचे गटनेतेपदी नियुक्ती केली आहे. ते आमचे मित्र आहे, सहकारी आहे. अयोध्येला ते माझ्यासोबत होते. त्यांच्याविषयी माझ्या मनात अजिबात व्यक्तिगत राग नाही, त्यांची व्यक्तिगत लढाई आहे, त्यांनी महाराष्ट्रात यावे, असं आवाहनही राऊत यांनी केलं.
'गुवाहाटीमध्ये आमदार बसले आहे. त्या आमदारांना आता 11 जुलैपर्यंत मुक्काम वाढवावा लागेल. त्यांना झाडी, डोंगराचा आनंद घ्यावा लागेल. कोर्टाचा महत्त्वाचा आदेश आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आहेत, आम्ही अजूनही त्यांना बंडखोर म्हणायला मानत नाही. त्यातील अनेक जण संपर्कात आहे. त्यांचे कुटुंबीय आमच्याशी संपर्क करत आहे. त्या लोकांना ज्या परिस्थितीत ठेवलं आहे, ती परत येतील असा आम्हाला विश्वास आहे' असं राऊत म्हणाले.
राज्यपाल यांनी खरंतर 12 आमदारांच्या निर्णय घेतला पाहिजे. त्यांची यादी राजभवनाच्या झाडीझुडपीत पडलेली आहे, ती शोधली पाहिजे. बरं आहे त्यांचा कोरोना बरा झाला आहे, ते कामाला लागले आहे. त्यांनी आता काम करावी, असा टोला राऊत यांनी लगावला.
दिपक केसरकर यांनी गुवाहाटीला जाण्याआधी माझा शिवसेनेचा योद्धा म्हणून सत्कार केला होता. बिकेसीला सभा झाली होती, त्यावेळी त्यांनी तुम्ही जी लढाई लढत आहात. मोठी रॅली काढून न्यावे, असं सांगितलं होतं. त्यांनी दोन वेळा मतदारसंघ बदलला आहे, त्यांना मोठ्या मनाने उद्धव ठाकरेंनी पक्षात घेतले होते, आता त्यांनी बोलू नये, असा टोलाही राऊत यांनी केसरकरांना लगावला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.