मुंबई 06 नोव्हेंबर: ‘मेट्रो’कार शेडवरून (Mumbai Metro car-depot) भाजप आणि शिवसेनेमध्ये (BJP and Shivsena)आता चांगलीच जुंपली आहे. केंद्राच्या नकाराला धुडकावून लावत मेट्रो कार शेड कांजुरमार्गालाच बांधण्याची घोषणा शिवसेनेने केलीय. आरेचा निर्णय रद्द केल्याने भाजपला धक्का बसला होता. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी या विषयावर थेट चर्चा करण्याचं आव्हान आदित्य ठाकरेंना दिलं आहे. मेट्रो कारशेडवर लपूनछपून मुलाखती देऊ नका थेट आमने- सामने या असं शेलार यांनी म्हटलं आहे.
शेलार म्हणाले, अस्मितेची ढाल करून इंच इंच जमीन आमचीच हा हट्ट शिवसेनेने सोडला पाहिजे. केवळ अहंकारी वृत्तीमुळे या मेट्रो कारशेडला उशीर होत असून त्याची पूर्ण जबाबदारी ही राज्य सरकारची राहिल असंही त्यांनी सांगितलं.
कारशेडच्या प्रस्तावामुळे सॉल्ट पॅनच्या लँडबाबत अप्रत्यक्षरीत्या उद्या होणाऱ्या 50 हजार कोटीच्या जागांच्या हस्तांतरणाच्या घोटाळ्याची पायाभरणी आपण काँग्रेस सोबत करताय की काय? असा सवालही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे.
आम्ही कुठल्याही व्यासपीठावर चर्चा करण्यास तयार आहोत असंही शेलार यांनी सांगितलं.
मा.पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेजींना जाहीर आवाहन..
आपण लपूनछपून मुलाखती देण्यापेक्षा मेट्रोच्या विषयावर थेट चर्चेला या! आम्ही कुठल्याही व्यासपीठावर चर्चा करण्यास तयार! @BJP4Maharashtra @ChDadaPatil @Dev_Fadnavis pic.twitter.com/ecVzpt7R3o
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) November 6, 2020
कांजुरमार्गची जागा ही महाराष्ट्राचीच असून त्याचे सगळे पुरावे आमच्याकडे आहेत असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला होता. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारमधला वाद आता आणखी पेटण्याची शक्यता आहे.
मेट्रो कारशेडचं काम थांबणार नाही असंही आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं. संबंधित जमीन महसूल विभागाची असून मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी जमिनीच्या सर्व न्याय प्रविष्ट बाबी पूर्ण केल्याची माहितीही आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून दिली होती.
कारशेडच्या प्रस्तावामुळे सॉल्ट पॅनच्या लँडबाबत अप्रत्यक्षरीत्या उद्या होणाऱ्या 50 हजार कोटीच्या जागांच्या हस्तांतरणाच्या घोटाळ्याची पायाभरणी आपण मा. उध्दव ठाकरेजी आज काँग्रेस सोबत करताय की काय? @BJP4Maharashtra @ChDadaPatil @Dev_Fadnavis pic.twitter.com/Afby0qPgjB
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) November 6, 2020
मेट्रो कारशेडला कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. भाजपने (BJP) राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध केला होता. पण, आता या वादात केंद्र सरकारनेही उडी घेतली आहे. केंद्र सरकारने कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडचे काम थांबवण्याचे आदेश दिले आहे. याबद्दल केंद्राने राज्याच्या मुख्य सचिवांना एक पत्र पाठवले आहे.
कांजूरमार्गमधील जागा ही मिठागराची असून त्यावरचा हक्का अद्याप सोडला नाही, त्यामुळे ही जागा एमएमआरडीएला देण्याचा निर्णय रद्द करा, असे पत्रच केंद्र सरकारने राज्याच्या सचिवांना पाठवले आहे. त्याचबरोबर कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडचे काम त्वरीत थांबावा, असंही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.