मुंबई, 27 सप्टेंबर : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यांच्या या भेटीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. तसंच, थोरात यांनी या भेटीला जास्त महत्त्व देवू नये, असंही म्हटलं आहे.
न्यूज18 लोकमतशी बोलत असताना बाळासाहेब थोरात यांनी संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली.
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन हे सरकार स्थापन केले आहे. राजकारणामध्ये इतर पक्षांच्या नेत्यांसोबत अशा भेटी होत असतात. दीपिका पदुकोणने चहा बिस्कीट खाल्ले अशा बातम्यांना जितके महत्त्व दिले जात आहे. तितकेच महत्त्व या भेटीला आहे. त्यामुळे या भेटीला माध्यमांनी फार महत्व देवू नये, असं थोरात म्हणाले.
तसंच, 'शिवसेना ही भाजपसोबत अनेक वर्षांपासून सोबत होती. मागील सरकारमध्येही शिवसेना भाजपसोबत होती. मागील सरकारमध्ये पाच वर्ष कशी वागणूक भाजपने दिली हे त्यांना चांगलेच माहिती आहे', अशी आठवणच थोरात यांनी सेनेला करून दिली.
'संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या या भेटीमुळे कोणतेची समीकरण तयार होणार नाही. महाविकास आघाडी सरकारला कसला ही धोका नाही', असा दावाही थोरातांनी केला.
राष्ट्रवादीच्या नेत्याने दिला सेनेला इशारा
'संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीमुळे माध्यमांमध्ये चर्चा सुरू आहे. पण, ही त्यांची व्यक्तिगत किंवा सामाजिक भेट असेल. या भेटीचा महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही. कारण, शिवसेना ही काही एकटी सरकार चालवत नाही तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस त्यांच्यासोबत आहे', अशी आठवणच राष्ट्रवादीचे नेते माजीद मेमन यांनी शिवसेनेला करून दिली.
तसंच, 'संजय राऊत यांना उद्धव ठाकरे यांनी असा कोणताही राजकीय अधिकार दिलेला नाही. मुळात शरद पवार हे महाविकास आघाडीमध्ये समन्यवाची भूमिका पार पाडत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला कोणताही धोका नाही, असंही माजिद मेमन यांनी स्पष्ट केले.
...म्हणून फडणवीस यांची भेट घेतली - संजय राऊत
दरम्यान, त्याआधी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन फडणवीस यांच्यासोबत भेटीबद्दल खुलासा केला आहे. 'देवेंद्र फडणीस हे राज्याचे विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री आहे. त्यामुळे त्यांना भेटणे हे काही गुप्तपणे नाही. ही काही बंकरमध्ये भेट नव्हती. त्यांच्याशी बऱ्याच दिवसांपासून भेटण्याचा विचार होता. त्यांची जाहीरपणे मुलाखत घेण्याचा विचार होता. याआधीही शरद पवार यांचीही मुलाखत घेण्याचा विचार होता. पण कोरोनाच्या काळामुळे ती झाली नाही. आता फडणवीस यांची मुलाखत घेण्याचा विषय आला आहे. महाराष्ट्रातील काही साहित्यिक संस्था आहे. त्यांनीही फडणवीस यांची प्रकट मुलाखत घ्यावी असा आग्रह केला आहे, असं राऊत यांनी सांगितलं.