मुंबई, 25 ऑगस्ट : शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले आहे. सोमवारीच काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ठाकरे सरकारमधून बाहेर पडण्यास एक मिनिट वेळ लागणार नाही, असं वक्तव्य केले होते. त्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आमदार नाराज असल्याचे मान्य केले आहे.
न्यूज 18 लोकमतशी बोलत असताना बाळासाहेब थोरात यांनी आमदारांच्या नाराजीबद्दल वक्तव्य केले आहे. 'शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा तीन पक्षाचं सरकार आहे. त्यामुळे सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे ही अपेक्षा आहे. काही घटना घडल्या आहेत ही वस्तुस्थिती आहे त्यात सुधारणा करू असं स्वतः मुख्यमंत्री मला म्हणाले आहेत. यासंदर्भात आमदारांशी बोलून त्यांचा आम्ही समाधान करू' असं थोरात म्हणाले.
तसंच, 'तिन्ही पक्षांचे मिळून 171 आमदार आहे. सध्याच्या परिस्थितीत सर्वांनी आपआपल्या मतदारसंघात राहुन काम करणे गरजे आहे आणि आमदारांना काय लागते काय नाही, हे जाणून घेणे आणि त्यांना मदत करणे याची जबाबदारी आमच्या सरकारवर आहे. काही आमदारांमध्ये नाराजी आहे ती आम्ही बोलून घालवू' असंही थोरात यांनी सांगितले.
त्याचबरोबर, आपआपल्या मतदारसंघात काम करत असताना काही पक्षातील आमदारांना जास्त निधी मिळाला आहे तर काहींना कमी आहे ही वस्तुस्थिती आहे. मात्र, यात सर्वांनाच निधी मिळाला असेही नाही. आमचे आमदार हे नाराज नाही, पण कामाबद्दल अपेक्षा आहे, असंही थोरातांनी स्पष्ट केले आहे.
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीवरुन काँग्रेसमध्ये दोन गट निर्माण झाले होते. विजय वडेट्टीवार आणि सुनील केदार यांनी आपली परखड भूमिका मांडली होती. त्यामुळे वाद निर्माण झाला होता. पण 'आमच्या पक्षातील नाराजी आणि आघाडी सरकारचा काही संबंध नाही.' असंही थोरात यांनी स्पष्ट केले आहे.