मुंबई, 18 एप्रिल: महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असताना आरोग्य यंत्रणा तोकड्या पडण्यास सुरुवात झाली आहे. रेमडेसिवीर, ऑक्सिजन (Oxygen), रुग्णांना बेड्स कमी (beds shortage) पडत आहेत. याच दरम्यान सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. विरोधी पक्षाकडून करण्यात येणाऱ्या आरोपांनंतर सत्ताधारी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड (Shiv Sena MLA Sanjay Gaikwad) यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली. मला कोरोनाचे जंतू मिळाले असते तर देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबले असते असे वक्तव्य गायकवाड यांनी केले. यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
शिवसेनेचे सगळेच संजय बेशिस्त
चंद्रकांत पाटील म्हणाले, वायफळ बडबड न करता महाराष्ट्राच्या हिताचा विचार करावा. शिवसेनेचे सगळेच 'संजय' बेशिस्त आहेत, यात आता कसळीही शंका उरली नाही. आधी राऊत, नंतर राठोड आणि आता गायकवाड.
बोलघेवड्यांनी वायफळ बडबड न करता महाराष्ट्राच्या हिताचा विचार करावा !शिवसेनेचे सगळेच 'संजय' बेशिस्त आहेत, यात आता कसलीही शंका उरली नाही. आधी राऊत, नंतर राठोड आणि आता गायकवाड.
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) April 18, 2021
अपशब्द वापरणं आमच्या राजकारणात नाही
महाविकास आघाडी सरकारच्या बेजबाबदारपणामुळे राज्यात मृत्यूतांडव सुरू आहे. मात्र, शिवसेनेचे बुलढाण्याचे बेशिस्त आमदार संजय गायकवाड या कठीण काळात सुद्धा आपली पातळी सोडताना दिसत आहेत. हे तेच बोलघेवडे कायकवाड आहेत ज्यांच्यावर अश्लील वक्तव्याप्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल केली होती. राजकारण हे राजकारणासारखं असावं. अपशब्द वापरणं, नेत्यांना चुकीचं नाव घेऊन संबोधणं, हे आमच्या राजकारणात बसत नाही. मात्र, आपली राजकीय पातळी सोडून जर भाजपा नेत्यांवर पुन्हा टीका केली तर मोबदल्यात तुम्हाला चपराक मिळेल, एवढं लक्षात असावं. टीका करण्यापेक्षा लसीकरणावर भर द्या. राज्य संकटात आहे, त्यावर तोडगा काढा असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
वाचा: बुलडाण्यात भाजप-शिवसेनेत तुफान राडा, शिवसैनिकांकडून पदाधिकाऱ्यांना मारहाण
कोरोना हाताळण्यात राज्य सरकार अपयशी
कोरोना हाताळण्यात महाविकास आघाडी सरकारचा अपयशी कारभार संपूर्ण देश पाहत आहे. जनतेची काळजी सर्वांनाच आहे आणि मुळात राज्य सरकारपेक्षा केंद्राला जास्त आहे. केंद्राने दिलेली भरमसाट मदत राज्य सरकारला योग्यरित्या वापरताच आली नाही असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
काय म्हणाले होते आमदार संजय गायकवाड ?
शिवसेनेचे बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना म्हटलं, केंद्र सरकारमुळे लाखो लोक मरतील त्याचं काय? ज्याच्या घरातला माणूस मरतो, ज्याच्या घरात जीव जातो त्याला समजतं की कोरोना काय आहे? मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते तर मी ते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chandrakant patil, Sanjay Raut (Politician), Shiv sena