नवी मुंबई, 6 डिसेंबर : केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्याविरोधात पंजाबमधील शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन सुरू केल्यानंतर आता देशभर त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. विविध राज्यातील शेतकरी संघटनांनी केंद्र सरकारला या मुद्द्यावरून इशारा देत 8 डिसेंबर रोजी भारत बंदची घोषणा केली आहे. या बंदला आता महाराष्ट्रातूनही प्रतिसाद दिला जात असल्याचं चित्र आहे. भारत बंदला एपीएमसीने पाठिंबा दिला आहे.
मुंबई आणि आसपासच्या शहरांसाठी फळे आणि भाजीपाला पुरवठ्यासाठी महत्त्वाचं मार्केट असणाऱ्या एपीएमसीने बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने याचा थेट परिणाम शहरातील नागरिकांवर होणार आहे. एपीएमसी मधील पाचही बाजारपेठा बंद राहणार आहेत. याबाबत माथाडी नेते शशिकांत शिंदे यांनी घोषणा केली आहे.
व्यापारी, माथाडी, वाहतूकदार, वारनार आदी सर्व घटकांनी भारत बंदला आपला पाठिंबा दर्शवला आहे. भाजीपाला, फळ, कांदा, बटाटा, अन्नधान्य, मसाला मार्केट बंद राहणार आहे.
दरम्यान, 'केंद्र सरकारने पारित केलेल्या शेतकरी विषयक तीन कायद्यांच्या विरोधात देशाच्या कानाकोपऱ्यातून विरोध होत आहे. पंजाब ,हरियाणा, उत्तरप्रदेश अशा राज्यातील शेतकरी बांधवांनी देशाची राजधानी दिल्ली येथे लाखोंच्या संख्येने एकत्रित येवून चक्का जाम आंदोलन केले आहे. या बळीराजाला साथ देण्यासाठी व शेतकरी ,व्यापारी व मार्केट कमिट्यांचे अस्तित्व आणि जीवन संपविणाऱ्या या तीन काळ्या कायद्याला विरोध करण्यासाठी मगंळवार 8 डिसेंबर 2020 रोजी संपूर्ण भारत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आपले फळ, भाजीपाला व कांदा बटाटा मार्केट मधील सर्व व्यवहार या दिवशी बंद रहाणार असून आपण सर्वांनी या बंदमध्ये सहभागी होऊन नव्या कायद्याचा निषेध करायचा आहे,' असं आवाहन एपीएमसीमधील संघटनांनी केलं आहे.