मुंबई, 21 जानेवारी : राज्यातल्या महाविकासआघाडी (Mahavikas Aghadi) सरकारची गाडी आपणच चालवत आहोत, या सरकारचं स्टेअरिंग आपल्याच हातात आहे, असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी केलं होतं. यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता. मुख्यमंत्री चांगली कार चालवतात, हे मी पाहिलं आहे, पण जेव्हा ते कार चालवतात तेव्हा ट्रॅफिक थांबलेला असतो, असं फडणवीस म्हणाले होते.
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'कार का सरकार यावर चर्चा करण्यापेक्षा कॉमन मिनिमम कार्यक्रमावर काम केले पाहिजे. या विषयावर चर्चा नको, असं मला वाटतं,' असं म्हणत अजित पवार म्हणाले.
काय म्हणाले होते मुख्यमंत्री?
सध्या कार आणि सरकार दोन्ही चालवत आहे. मध्ये मध्ये खड्डे आणि अडचणी येत आहेत, पण त्याचा माझ्यावर काहीच परिणाम होणार नाही, माझ्या हाती राज्याचं स्टेरिंग भक्कम आहे, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. मुख्यमंत्र्यांना सरकार चालवण्यात नेमक्या कोणत्या अडचणी येत आहेत आणि राज्याची गाडी चालवताना रस्त्यात खड्डे कोण खणत आहेत? या प्रश्नांच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या होत्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.