मुंबई/कोल्हापूर, 04 जून : रविवारी असलेल्या शिवराज्याभिषेक दिन (Shivrajyabhishek Din) सोहळ्याच्या मुद्द्यावरून एक नवा वाद समोर आला आहे. संपूर्ण राज्यात शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात येत आहे. त्यासाठी ग्रामविकास विभागानं ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांमध्ये हा सोहळा साजरा करण्याचे आदेश दिले आहेत. यादिवशी भगवा ध्वज (Orange Flag) असलेली गुढी उभारली जाणार आहे. पण त्याला अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंनी (Advocate Gunratna Sadavarte) विरोध केला आहे. त्यामुळं आता नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.
(वाचा-‘असे पब्लिसिटी स्टंट पुन्हा करु नका’; जूही चावलाची 5G याचिका कोर्टानं फेटाळली)
संपूर्ण राज्यात 6 जून रोजी शिवराज्याभिषेक दिना साजरा होणार आहे. त्यासाठी राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन साजरा करण्याचे आदेश ग्रामविकास विभागानं दिले आहेत. यासाठी एक विशेष ध्वजही तयार करण्यात येत आहे. शिवशक, राजदंड आणि स्वराज्याची गुढी उभी करण्यात येणार आहे. गुढीला भगवा स्वराज्य ध्वजसंहिता लावण्यात येणार आहे.
असा असेल ध्वज...
हा ध्वज कसा असावा हे ठरवून देण्यात आलं आहे. ध्वज तीन फूट रुंद, सहा फूट लांब असेल. भगव्या रंगाच्या ध्वजाला सोनेरी किनार असेल. ध्वजावर जिरेटोप, सुवर्ण होण, जगदंब तलवार, शिवमुद्रा, वाघनखं अशी शिवरायांची पाच शुभचिन्हं असतील. किमान 15 फूट उंच बांबूवर ही गुढी उभारण्याचे निर्देश आहेत.
(वाचा-मुंबईतील धक्कादायक Video; तोल जावून रेल्वेतून पडणाऱ्याला पोलिसांनी वाचवलं,)
गुणरत्न सदावर्तेंचा विरोधात
दरम्यान, सरकारच्या या आदेशाला वकील गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध दर्शवला आहे. शासकीय कार्यालयांमध्ये तिरंग्याच्या व्यतिरिक्त कोणताही ध्वज लावण्यास परवानगी नसते. हा प्रकार देशाच्या एकसंधतेचा अवमान करण्याचा आणि संविधानाची पायमल्ली करणारा असल्याचं सदावर्ते यांनी म्हटलं आहे. त्यामुळं हा आदेश रद्द करावा आणि तो काढणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी तशीच या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी सदावर्तेंनी केली आहे. हा प्रकार म्हणजे देशद्रोह असून जर हा आदेश मागं घेतला नाही, तर सुप्रीम कोर्टापर्यंत धाव घेण्याचा इशारादेखिल गुणरत्न सदावर्ते यांनी दिला आहे.
शासकीय कार्यालयांवर तिरंग्याशिवाय इतर ध्वज फडकावण्यास गुणरत्न सदावर्तेंचा विरोध. हा देशद्रोह असल्याचं म्हणत सुप्रीम कोर्टात जाण्याचा त्यांनी इशारा दिला आहे pic.twitter.com/ehK1H5LhCk
— News18Lokmat (@News18lokmat) June 4, 2021
हा प्रकार म्हणजे देशद्रोही कृत्य असल्याची टीका सदावर्ते यांनी केली आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला होता. तसंच या मुद्द्यावरून मराठा नेत्यांवर टीका केली होता. या प्रकरणीदेखेल मराठा समाजाला खूश करण्यासाठी सरकार हे करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळं यावरून आता नवा वाद उभा राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kolhapur, Maharashtra News, Mumbai