16 जून : 1993 मध्ये मुंबईत झालल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी अबु सालेम, मुस्तफा डोसा यांच्यासह पाच जणांना विशेष टाडा न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. विशेष टाडा कोर्टाने शुक्रवारी हा निकाल दिला. 1993 च्या बॉम्बस्फोट प्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम, मुस्तफा डोसा, फिरोज खान, ताहिर मर्चंट, रियाज सिद्दीकी, करीमुल्लाह शेख आणि अब्दुल कयूम, अशी त्या सात आरोपींवर शेवटची सुनावनी झाली.
दरम्यान, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने मुस्तफा डोसा यानं दुबईत बसून पाकिस्तानच्या मदतीने भारतात आरडीएक्स या स्फोटकासह मोठय़ा प्रमाणात शस्त्रे, दारूगोळा पाठवला. रायगडच्या दिघी, शेखाडीसह गुजरातच्या भरूच किनाऱ्यावर डोसाचा मोठा भाऊ मोहम्मद व साथीदारांनी तो उतरवून घेतला. याच स्फोटकांच्या जोरावर मुंबईत भीषण बॉम्बस्फोट मालिका घडवणे दहशतवाद्यांना शक्य झाले, असा आरोप ठेवला होता. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचा आरोप ग्राह्या मानत विशेष टाडा न्यायालयाने डोसाला दोषी ठरवले.
देशाची आर्थिक राजधानी असलेले आणि जगभरातील लोकांच्या आकर्षणाचे ठिकाण असलेलं मुंबई शहर 12 मार्च 1993 या दिवशी हादरून गेलं. या दिवशी मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात 257 जण मृत्युमुखी पडले. तर, 713 जण जखमी झाले. हा बॉम्बस्फोट इतका शक्तीशाली होता की, यात 27 कोटी रूपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले. हा बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी तब्बल 3 हजार किलो आरडीएक्स पाकिस्तानातून आणले गेले होते. त्यापैकी फक्त 10 टक्के आरडीएक्सचा वापर केला गेला होता.
दरम्यान, टाडा न्यायालयाने साखळी बॉम्बस्फोटातील एकूण 129 आरोपींपैकी 100 आरोपींना आतापर्यंत दोषी ठरवले आहे. त्यापैकी काहींना 6 महिने तर काहींना मरेपर्यंत जन्मठेपीची शिक्षा सुनावली आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा