नवी दिल्ली 2 जून : युरोपमध्ये (Europe) गेल्या काही महिन्यांपासून रशिया-युक्रेन युद्ध सुरू आहे. जवळपास चार महिने उलटून गेले तरी अद्याप युद्धबंदीची अधिकृत घोषणा झालेली नाही. युक्रेनच्या (Ukraine) अंतर्गत भागात अजूनही रशियन सैन्य तैनात आहे. रशियानं उचलेल्या पावलानंतर अमेरिकेच्या (US) नेतृत्वाखाली नाटोनं (NATO) पूर्व युरोपमधील हालचाली तीव्र केल्या होत्या. दोन्ही देशांदरम्यानच्या वाढत्या लष्करी तणावामुळे इतर देशांनादेखील त्याची झळ बसली आहे. अनेक देशांच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराला रशिया-युक्रेन युद्धाचा फटका बसला आहे. मुख्यत: अनेक देशांना गहू टंचाईचा (Wheat Scarcity) सामना करावा लागत आहे. त्यामुळे जिथून मिळेल आणि जसा मिळेल तसा गहू पदरी पाडून घेण्याचे प्रयत्न काही देशांनी सुरू केले आहेत. अशी परिस्थिती असूनही तुर्कीने (Turkey) मात्र, भारताकडून मिळालेली गव्हाची खेप (Indian Wheat Consignment) परत केली आहे. भारतातील गव्हात रुबेला विषाणू (Rubella Virus) आढळून आल्याचे तुर्कीने म्हटले आहे. आज तकनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
एस अँड पी ग्लोबल कमॉडिटी इनसाइट्सच्या अहवालानुसार, एका तुर्की जहाजात 56 हजार 877 टन गहू भरलेला होता. आता हे जहाज तुर्कीहून गुजरातच्या कांडला बंदराकडे परत निघाले आहे. तुर्कीने गव्हातील फायटोसॅनिटरी समस्यांचे (Phytosanitary Problems) कारण देत 29 मे रोजी भारतातून आलेली गव्हाची खेप परत केली आहे. इस्तंबुल (Istanbul) येथील एका व्यापाऱ्याने सांगितले की, भारतातील गव्हात रुबेला विषाणू आढळून आला आहे. यामुळे तुर्कीच्या कृषी मंत्रालयाने (Turkish Ministry of Agriculture) ही खेप स्वीकारण्यास नकार दिला. व्यापाऱ्याने सांगितले की, गव्हाने भरलेले हे जहाज जूनच्या मध्यापर्यंत कांडला बंदरात (Kandla Port) परत येईल.
खाद्य तेलाच्या किमती कमी करण्यासाठी केंद्र सरकारचं मोठं पाऊल; मात्र सोने-चांदीचे दर वाढण्याची शक्यता
रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर जागतिक स्तरावर गव्हाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. रशिया आणि युक्रेन हे दोन्ही देश गव्हाचे सर्वात मोठे उत्पादक (Wheat Producers) आहेत. गव्हाच्या जागतिक बाजारपेठेत, जगातील एक चतुर्थांश गव्हाचा पुरवठा या दोन देशांमधून केला जातो. एस अँड पीच्या अहवालानुसार, या परिस्थितीमुळे इतर निर्यातदार देश चिंतेत पडले आहेत. येत्या काही दिवसांत इजिप्तसह इतर देशांमध्ये गव्हाच्या काही खेपा पोहोचणार आहेत.
गव्हाचे संकट असताना आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गहू खरेदीसाठी पर्याय शोधले जात असताना तुर्कीने हा निर्णय घेतला आहे. समोर आलेल्या वृत्तानुसार, मोदी सरकारच्या गव्हाच्या निर्यातीवर बंदी (Wheat Export Ban) घालण्याच्या निर्णयानंतर जवळपास 12 देशांनी भारताकडे मदत मागितली आहे. गहू निर्यातबंदीनंतर भारताने इजिप्तला 60 हजार टन गहू पाठवला आहे.
डिझेल इंजिन ट्रेनसाठी किती इंधन खर्च होत असेल? एका लीटरमध्ये किती धावते माहितीये का?
रशिया-युक्रेन युद्धामुळे बाजारात गव्हाचा तुटवडा असताना भारत इतर देशांसाठी आशेचा किरण म्हणून उदयास आला होता. मात्र, भारत सरकारनेदेखील 13 मे रोजी गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली. ज्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली. देशांतर्गत गव्हाच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी भारताने हा निर्णय घेतला. भारतातील गव्हाच्या निर्यातीवर अचानक बंदी आल्याने सुमारे 18 लाख टन धान्य विविध बंदरांवर अडकलं आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. तुर्कीने भारतातील गहू नाकारला आहे. यावर भारताने अद्याप आपली प्रतिक्रिया दिलेली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.