नवी दिल्ली, 16 डिसेंबर: पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi Scheme) सातवा टप्पा जारी करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 3 हप्त्यांमध्ये 6000 रुपये थेट त्यांच्या खात्यामध्ये पाठवण्यात येतात. दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून मोदी सरकारची (Modi Government) ही महत्त्वाची योजना असणाऱ्या शेतकरी सन्मान निधी योजनेमध्ये घोटाळ्याच्या काही घटना समोर येत आहेत. काही ठिकाणी या योजनेसाठी अपात्र असणाऱ्या लोकांच्या खात्यातही पैसे पाठवण्यात आले आहेत. अलीकडे अशा देखील घटना समोर आल्या आहेत की ज्यांनी या योजनेसाठी नोंदणी देखील केली नाही अशा लोकांच्या खात्यातही आर्थिक मदतीचे 6000 आले आहेत.
मनीकंट्रोलमधील बातमीनुसार, UIDAI आणि TRAI चे माजी प्रमुख राम सेवक शर्मा (Ram Sewak Sharma) यांच्या SBI खात्यामध्ये वर्षातून तीन वेळा पीएम शेतकरी सन्मान निधीचे एकूण 6000 रुपये पाठवण्यात आले आहेत. शर्मा यांनी या योजनेसाठी नोंदणी देखील केली नव्हती. शर्मा यांनीच अशी माहिती दिली आहे की, त्यांनी नोंदणी केल्याशिवाय त्यांची नोंदणी झाली आहे. शर्मा यांनी म्हटलं आहे की, 'याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. राज्य सरकारने ओळख न पटवता व्हेरिफिकेशन कसं काय केलं?'
(हे वाचा-या व्यवसायात आहे दमदार फायदा, तुम्हाला मिळेल 9 लाखांपर्यंत उत्पन्न)
शर्मा यांनी माहिती दिली की, पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत त्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपयांचे 3 हप्ते पाठवण्यात आले. शर्मा यांनी हे खाते 8 जानेवारी 2020 रोजी बनवले होते. 9 महिने ते खाते सक्रीय होते, आणि 24 सप्टेंबरला ते डिअॅक्टिव्हेट झालं. त्यांचं हे खातं उत्तर प्रदेशमधील फिरोझाबाद जिल्ह्यातील एका शेतकऱ्याचं खातं म्हणून रजिस्टर होतं. त्यांचं SBI खातं ज्यामध्ये पैसे पाठवण्यात आले होते, ते एक हिंदू अविभाजीत कुटुंबाचं खातं आहे. ज्याचा वापर कृषी उत्पन्न इ. कामांसाठी केला जात असे.
शर्मा यांना ज्यावेळी याबाबत माहित झाले तेव्हा त्यांनी बँकेला सूचित केलं, ज्याबाबत अद्याप कोणतंही उत्तर आलेलं नाही आहे. मात्र त्यांचे खातं निष्क्रिय करण्यात आलं आहे. शर्मा यांनी असं सांगितलं की ते शेतकरी सन्मान निधीचे पैसे मिळवण्यासाठी अपात्र आहेत कारण ते कर भरतात.
याआधी अभिनेता भगवान हनुमान, ISI गुप्तहेर महबूब अख्तर आणि अभिनेता रितेश देशमुख यांच्या नावाने देखील पीएम शेतकरी सन्मान निधीमध्ये खातं बनवण्यात आलं आहे. यांचे आधार कार्ड सार्वजनिक स्वरुपात उपलब्ध ाहेत. हनुमानच्या खात्यात 6000, महबूब अख्तर यांच्या खात्यात 4000 तर रितेश देशमुखच्या खात्यात 2000 रुपये पोहोचले होते.