नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर : ग्राहकांच्या सुरक्षेसाठी वेळोवेळी विविध सुविधा घेऊन येणाऱ्या एसबीआयने (State Bank of India) एटीएममधून पैसे सुरक्षितपणे काढता यावेत याकरता ना नियम लागू केला आहे. एसबीआय एटीएमधून 10 हजार किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम काढायची असेल तर तुमच्या रजिस्टर्ड नंबरवर आलेला ओटीपी द्यावा लागेल. 18 सप्टेंबरपासून हा नियम लागू करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे 1 ऑक्टोबरपासून SBI ने परदेशी व्यवहारांबाबचे काही नियम बदलले आहेत. ग्राहकांना आता परदेशात पैसे पाठवता अतिरिक्त शुल्क आकारले जात आहे.
दरम्यान एटीएमने वन टाइम पासवर्ड (OTP) आधारित एटीएम कॅश विड्रॉल सुविधा 24 तास लागू असण्याबाबत एक ट्वीट केले आहे. बँकेने ग्राहकांना या ट्वीटमधून अलर्ट राहण्याचा सल्ला दिला आहे.
रात्रीच्या वेळी एटीएममधून पैसे काढताना अनेकदा ग्राहकांना फसवणुकीला सामोरे जावे लागते. अशावेळी एटीएम फसवणुकीपासून (ATM Fraud) वाचण्यासाठी देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने ग्राहकांसाठी ओटीपी आधारित टीएम विड्रॉल (SBI OTP Based ATM Withdrawal) सुविधा 1 जानेवारी 2020 पासून सुरू केली होती. याअंतर्गत रात्री 8 ते सकाळी 8 वाजेपर्यंत जर तुम्ही 10 हजार किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम काढणार असाल तर ओटीपी (OTP) द्यावा लागत होता. आता ही सुविधा संपूर्ण 24 तासात 10 हजार किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम काढण्यासाठी लागू झाली आहे.
एसबीआय एटीएममधून 10 हजार किंवा त्यापेक्षा जास्त पैसे काढण्यासाठी तुमच्या रजिस्टर्ड मोबाइलवर ओटीपी येईल. एकदा ग्राहकांनी एटीएममध्ये पैसे काढण्याची रक्कम प्रविष्ट केली की एटीएम स्क्रीन ओटीपी विचारेल, जिथे आपल्याला आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर आलेला ओटीपी टाकावा लागेल.
पैसे काढण्यासाठी मोबाइल घेऊन जाणे अनिवार्य
एसबीआयने त्यांच्या ग्राहकांना अशी सूचना दिली आहे की जर तुम्हाला 10 हजार किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम काढायची असेल, तर आता मोबाइल घेऊन जाणे अनिवार्य आहे. बँकेने यासंदर्भात ग्राहकांना SMS देखील पाठवला आहे.