असीम मनचंदा, नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर: कोरोना संकटाच्या (Coronavirus) काळात डाळींच्या वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचं बजेट कोलमडलं आहे. भाज्या, डाळी, खाद्यतेल तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीही वेगाने वाढत आहेत. अनलॉक -5 (Unlock 5) लागू झाल्यानंतर मागणी आणि पुरवठा यामध्ये मोठा फरक असणे हे यामागील महत्त्वाचे कारण आहे. डाळी व भाजीपाल्याचे दर कमी करण्यासाठी सरकार काही पावलं उचलत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार डाळींचे दर कमी करण्यासाठी सरकार खुल्या बाजार विक्री योजनेच्या माध्यमातून विकल्या जाणाऱ्या डाळींवर सवलत देऊ शकते. प्राइज मॉनेटरिंग कमिटीने प्रति किलो 10 ते 15 रुपयांची सूट देण्याची शिफारस केली आहे.
तूरडाळीची किंमत 100 रुपयांच्या पलीकडे
ओपन मार्केट स्कीमच्य विक्रीतून नाफेडकडून डाळींचा लिलाव केला जातो. या योजनेत विकल्या जाणाऱ्या डाळींवर सवलत दिली जाऊ शकते. सध्या राज्यं, निमलष्करी दलं आणि अंगणवाडीसारख्या ठिकाणी पाठविलेल्या डाळींवर सरकार सूट देते आहे. त्याचबरोबर घाऊक बाजारात तुरडाळीची किंमत 115 रुपये किलोच्या पलीकडे गेली आहे. दिल्लीसह अनेक बड्या शहरांमध्ये डाळींच्या किंमती 15 ते 20 रुपयांनी वाढल्या आहेत. गेल्या महिन्याभरापासून तूर डाळीमध्ये 20 टक्क्यांची वाढ झाली आहे. याशिवाय मूग आणि उडीद डाळदेखील दहा टक्क्यांनी महागली आहे.
(हे वाचा-नोकरदारांसाठी बेस्ट आहेत या 4 LIC पॉलिसी, जीवन विम्याबरोबर मिळतील लाखो रुपये)
सरकारने डाळीचा बफर स्टॉक 20 लाख टन करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील डाळींच्या कमतरतेवर उपाय आणि वाढणारे मुल्य आटोक्यात आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक बाबींवरील मंत्रिमंडळाच्या समितीने डाळींचा बफर स्टॉक 20 लाख टनापर्यंत वाढवण्याच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. बफर स्टॉकसाठी देशांतर्गत बाजारातून 1 दशलक्ष टन डाळी खरेदी केल्या जातील, तर 10 लाख टन आयात होईल.
(हे वाचा-आजपासून बंद होणार 94 वर्ष जुनी बँक, ग्राहक आणि गुंतवणुकदारांसाठी होणार असे बदल)
बफर स्टॉकसाठी डाळींचे विशिष्ट प्रकार आणि प्रमाण देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील उपलब्धता आणि किंमतींच्या आधारे ठरविले जातील. त्यात काही बदल झाल्यास त्यास मान्यता घ्यावी लागेल.