मुंबई, 25 जुलै- एकीकडे राष्ट्रवादीत नेते पक्ष सोडून जात असताना पक्षातील राजकारण मात्र थांबताना दिसत नाही. राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. अहिर आता शिवसेनेच्या गोटात सामिल झाले आहे. दुसरीकडे दिल्लीत मुंबई अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. त्याच्या अधिकृत घोषणेआधीच पक्षातून मलिक यांच्या नावाला विरोध होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
या नावांना प्रदेशाध्यक्षांनी दिली पसंती..
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना मजीद मेमन आणि विद्या चव्हाण यांच्या नावाला पसंती दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदी मलिक यांच्या निवडीस तुर्तास लाल दिवा दाखवण्यात आला आहे. त्यामुळे आता मुंबई अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
..तर पक्षावर ही वेळ आली नसती, राष्ट्रवादीच्या माजी प्रदेशाध्यक्षांची सणसणीत चपराक
सचिन अहिर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. सचिन अहिर यांनी राष्ट्रवादी सोडत हाती शिवबंधन बांधले आहे. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी पक्षालाच घरचा आहेर दिला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे आपण मुंबई अध्यक्षपद मागितले होते. पण, त्यांनी ते दिले नाही. मुंबई अध्यक्षपद मला मिळाले असते तर पक्षावर आज ही वेळ आली नसती, अशी सणसणीत चपराक भास्कर जाधव यांनी लगावली आहे. भास्कर जाधव गुरूवारी सिंधुदुर्गात विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी आले होते. यावेळी जाधव यांनी सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशावर प्रतिक्रिया दिली. कोकणातल्या पक्षाच्या स्थितीकडेही राष्ट्रवादी नेतृत्त्वाने दुर्लक्ष केले आहे, अशी खंतही भास्कर जाधव यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
SPECIAL REPORT : मिशन राष्ट्रवादीला खिंडारमध्ये आदित्य ठाकरेंनी बजावली मोठी भूमिका!
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा