नवी दिल्ली 6 जानेवारी : भाजपच्या मदतीने खासदार झाल्यानंतर कायम नाराजी व्यक्त करणारे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांची भाजपने मनधरणी केल्याचं स्पष्ट झालंय. भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी लोकसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठी पक्षाच्या विविध समित्यांची घोषणा केली. त्यात भाजपचं संकल्प पत्र तयार करणाऱ्या समितीमध्ये नारायण राणे यांचंही नाव आहे.
भाजप आणि शिवसनेची युती झाली तर भाजपसोबत राहणार नाही असं राणे यांनी या आधीच जाहीर केलं होतं. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर त्यांनी भाजपला आत्मपरिक्षणाचा सल्लाही दिला होता. काही आठवड्यांपूर्वी कोकण दौऱ्यावर असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे नारायण राणे यांना भेटायला त्यांच्या घरीही गेले होते.
त्यामुळे राणेंच्या मनात नेमकं काय चाललंय याची चर्चा सुरू होती. राणे भाजपची साथ सोडतील असंही बोललं जात होतं. मात्र भाजपने राणेंची समजूत काढल्याची शक्यता आहे. कारण राणे यांच्या परवानगीशीवाय त्यांचं नाव भाजपने महत्त्वाच्या समितीत टाकलंच नसतं.
संकल्प पत्र म्हणजे निवडणुकीसाठीचा जाहीरनामा असतो. हा जाहीरनामा हा अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट समजलं जातं. या समितीत ज्येष्ठ नेत्यांचा समावेश केला जातो. त्यामुळं या समितीत राणे यांना स्थान देऊन भाजपने त्यांच्या बद्दल आदर दाखविल्याचं बोललं जाते. तर शिवसेनेलाही इशारा देण्याचं कामही यातून भाजपने केलं आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा