गडचिरोली, 16 डिसेंबर: गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्याचा घटनांमध्ये वाढ झाली आहे. वाघाच्या हल्ल्यात एक महिला ठार झाली आहे. सुधा अशोक चिलमवार (वय-58, रा. इंदिरानगर) असं मृत महिलेचं नाव आहे.
गडचिरोली वनविभागाच्या मुख्यालयापासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या चांदाडा मार्गावर ही घटना घडली आहे.
हेही वाचा..नवरदेवाने लग्नात मित्रांसाठी केली नाही दारुची सोय; क्रूर प्रकारे घेतला बदला
मिळालेली माहिती अशी की, सुधा चिलमवार यांच्यासह 3-4 महिला जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. जंगलात महिला सरपण गोळा करत असताना त्यांच्यावर वाघानं अचानक हल्ला केला. सुधा चिलमवार या महिलेला वाघानं ठार मारून आपल्या जबड्यात पकडून जंगलात नेलं. आता या महिलेचा वाघानं अर्धवट खाल्लेला मृतदेह सापडला आहे. वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहचले आहे. या घटनेमुळे गडचिरोली शहरात चांगलीच दहशत पसरली आहे.
दुसरीकडे, चंद्रपूर जिल्ह्यात देखील वाघाच्या हल्ल्याच्या घटना वाढल्या आहे. गेल्या 3 महिन्यात चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात 5 जणांचा बळी गेला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी चिमूर तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. होता. राजू दडमल असं 47 वर्षीय शेतकऱ्याचे नाव आहे. हा शेतकरी दोन दिवसांपूर्वी शेतात गेला होता आणि तेव्हापासून बेपत्ता होता. अखेर कोलारा भागातील जंगलात या शेतकऱ्याचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली होती.
धक्कादायक म्हणजे, गेल्या 3 महिण्यात वाघाच्या हल्ल्यात या भागातला हा 5 वा बळी आहे. ज्या भागात वाघाच्या हल्ल्याच्या या सर्व घटना घडल्या आहे. तो भाग ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या जवळ आहे.
हेही वाचा..3 महिन्यांपासून पगार नाही, कसं जगायचं? पुणे कोविड सेंटरमधील योद्धा रस्त्यावर
या भागात जंगली जनावरांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. शेती आणि इतर कामांसाठी गावकरी या भागात जातात आणि जंगली जनावरांच्या हल्ल्यात बळी पडतात. या घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी या वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली असली तरी या वाघाचा बंदोबस्त कसा करायचा हा मोठा प्रश्न वन विभागासमोर निर्माण झाला आहे.