मुंबई, 25 मे : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, तर आज ते शरद पवारांना भेटण्यासाठी आले होते. शरद पवारांच्या भेटीनंतर अरविंद केजरीवाल यांनी या भेटींचं कारण सांगितलं आहे. 2015 साली दिल्लीत आपचं सरकार आल्यानंतर केंद्र सरकारने एक अध्यादेश काढून अधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याचा दिल्ली सरकारचा अधिकार काढून घेतला. यासाठी आम्ही 8 वर्ष न्यायालयीन लढाई लढलो. या लढाईमध्ये आम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये यश आलं. 5 न्यायाधिशांच्या पीठाने 5-0 ने आमच्या बाजूने निकाल दिला, तरीही केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाच्या निकालाविरोधात अध्यादेश आणला आहे. लोकसभेमध्ये भाजपकडे बहुमत आहे, पण राज्यसभेत त्यांच्याकडे आकडे नाहीत, त्यामुळे देशभरातल्या विरोधकांनी या अध्यादेशाविरोधात राज्यसभेत मतदान करावं, अशी मागणी अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.
काय म्हणाले केजरीवाल?
'ही फक्त दिल्लीची लढाई नाही, ही फेडरल स्ट्रक्चरसाठीची लढाई आहे. भाजप जिकडे त्यांचं सरकार नसेल तिकडे तीन गोष्टी करत आहे. भाजपविरोधी सरकार असेल तर, आमदार खरेदी करून सरकार बनवलं जातात. नाहीतर ईडी-सीबीआयला पाठवून आमदारांना घाबरवलं जातं आणि फोडलं जातं. विकले आणि तुटले नाही, झुकले नाही तर अध्यादेश आणून सरकारला काम करू दिलं जात नाही', असा आरोप केजरीवाल यांनी केला आहे.
'ईडी-सीबीआयच्या मदतीने महाराष्ट्रातही तेच झालं. ही देशासाठी धोकादायक स्थिती आहे. शरद पवार देशातल्या सगळ्यात मोठ्या नेत्यांपैकी एक आहेत. तुम्ही सगळ्यांशी बोला आणि या बिलाला विरोध करण्यासाठी एकत्र यायला सांगा. हे बिल राज्यसभेत पडलं तर ती 2024 साठीची सेमी फायनल असेल आणि 2024 ला मोदी सरकार येणार नाही, हाच संदेश जाईल', असं अरविंद केजरीवाल शरद पवारांना म्हणाले आहेत.
शरद पवारांचा पाठिंबा
'सध्या लोकशाहीवर आघात होतोय, ही समस्या फक्त एका दिल्लीची नाही तर देशाची आहे. केजरीवाल समर्थन मागण्यासाठी आले आहेत. केजरीवालांना राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे. भाजपविरोधी पक्षांनी एकत्र यायची गरज आहे. आपण देशभरातल्या विरोधकांसोबत बोलू', असा विश्वास शरद पवारांनी केजरीवालांना दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Arvind kejriwal, Sharad Pawar