गुहागर 8 नोव्हेंबर: राज्याला राजकीय नेत्यांची वादग्रस्त वक्तव्य काही नवी नाही. शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव (Shivsena MLA Bhaskar Jadhav) हे बिनधास्त आणि बेधडक वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत. पण गुहागरमध्ये त्यांनी बेधडकच नाही तर धक्कादायकं विधानं केली आहेत. शिवसेनेच्या उप तालुका प्रमुखाने पोटापाण्यासाठी दारू विकली तर काय झालं? पोलीस (Police) हाफ्ते घेत नाही का? असा उलटा सवालही त्यांनी केला. एवढ्यावर ते थांबले नाहीत तर दोन गोष्टी सोडून तुम्ही काहीही करा मी तुमच्या पाठिशी आहे असंही ते कार्यकर्त्यांना म्हणाले.
लॉकडाऊन मध्ये दारू विक्री करताना गुहागर पोलिसांनी शिवसेनेचे उप तालुका प्रमुख बाबू सावंत यांच्यावर कारवाई केली होती. त्यावर बोलताना आमदार भास्कर जाधव यांनी पोलिसांचाच समाचार घेतला. पोटापाण्यासाठी दारू विकली तर काय झालं? तुम्ही पोलीस हप्ते घेत नाही का? असं ते म्हणाले. मी तुमच्या पाठीशी आहे असेही भास्कर जाधव यांनी जाहीरपणे सांगितलं.
भास्कर जाधवांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा आहे. मुलींची छेडछाड आणि चोरी या फक्त दोन गोष्टींसाठी मला फोन करू नका बाकी कोणत्याही गोष्टीला तुम्ही घाबरू नका, भास्कर जाधव तुमच्या पाठीशी आहे असंही त्यांनी कार्यकर्त्यांना आश्वास्त केलं.
भाजपच्या जीवावर महाराष्ट्रात शिवसेना निवडून आली असं म्हणणाऱ्या भाजप नेत्यांचा भास्कर जाधव यांनी चांगला समाचार घेतला. ते म्हणाले, ज्यांच्याशी मैत्री करायची त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याची भाजपची जूनी परंपरा आहे. ही परंपरा भाजप नेहमीच पाळत आली आहे. युती असूनही विधानसभा निवडणुकीत भाजपने आपल्याला कसा दगा दिला हे भास्कर जाधव यांनी आपल्या भाषणातून सांगितले.
गुहागर: शिवसेनेच्या उप तालुका प्रमुखाने पोटापाण्यासाठी दारू विकली तर काय झालं? पोलीस हाफ्ते घेत नाही का? भास्कर जाधव यांचं वादग्रस्त वक्तव्य pic.twitter.com/KNQ7jLc3rJ
— News18Lokmat (@News18lokmat) November 8, 2020
यावेळी बोलताना भास्कर जाधव यांनी राज्यातील भाजप नेत्यांवर देखील जोरदार टीका केली. महाराष्ट्रात आज भाजप केवळ बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनामुळेच आहे असे म्हणत त्यांनी भाजपवर चौफेर टीका केली, ते म्हणाले तिकडे बिहारमध्ये जाऊन राज्याचे माजी मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही फक्त नरेंद्र मोदी यांना मानतो दुसरं कोणाला मानत नाही, पण एक लक्षात घेतलं पाहिजे की बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे नरेंद्र मोदी राजकारणात पुढे आलेत हे विसरून चालणार नाही.
आज राम मंदिराची वीट उभारली जाणार असेल तर ती पहिली स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने लावली गेली पाहिजे असेही ते म्हणाले. ज्यावेळी बाबरीचा मुद्दा समोर आला त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच नाव सर्वात पुढे होतं हे भाजपच्या नेत्यांनी लक्षात घायला हवं असं ते म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bhaskar jadhav, Shivsena