मुंबई, 7 सप्टेंबर : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पाऊस पडतोय. या पावसामुळे अनेक भागांमधील जनजीवन विस्कळीत झालंय. रायगड जिल्ह्यातील पेण जिल्ह्यामध्ये तर पावसाचा हाहाकार उडालेला बघायला मिळाला. पावसामुळे अनेक बाजारपेठांमध्ये पाणी साचलं. अनेक दुकानं आणि घरांमध्ये पाणी शिरलं. विशेष म्हणजे काही ठिकाणी दोन-तीन तास मुसळधार पाऊस पडल्यानंतर पावसाने विश्रांती घेतली होती. पण ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहरात पुन्हा विजेचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. हा मुसळधार पाऊस आणखी किती वेळ असेल याबाबत हवामान विभागाकडून महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अति मुसळधार स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट होण्याची दाट शक्यता आहे. हवामान विभागाने 7 ते 11 सप्टेंबर या दरम्यान मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याची माहिती दिली आहे.
विशेष म्हणजे राज्यात आज सकाळी कडाक्याचं ऊन पडलं होतं. पण दुपारनंतर वातावरणात अचानक बदल झाला. अनेक ठिकाणी वादळी वारे वाहू लागले. ढगांच्या गडगजाटासह विजा चमकू लागला. आभाळ दाटून आलं. ठिकठिकाणी परिसरामध्ये काळोख झालेला बघायला मिळाला. त्यानंतर मुसळधार पाऊस पडला. ठिकठिकाणी हा पाऊस दोन ते तीन तास पडला. या दरम्यान अनेक ठिकाणी पाणी साचलं. जनजीवन विस्कळीत झालं. त्यानंतर पावसाने जरावेळ उसंत घेतली. पण त्यानंतर पुन्हा ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट सुरु झाला. पाऊस पुन्हा कोसळू लागला. त्यामुळे नागरीकही हैराण झाले.
(पेणमध्ये अक्राळविक्राळ पाऊस, रस्ते पाण्याखाली, बाजारपेठेत पाणी, पावसाचा भयानक विद्रोह, पाहा VIDEO)
वातावरणात झालेला हा बदल खरंतर अनपेक्षित आहे. वातावरणातील हे बदल आणखी किती वेळ राहील, पाऊस किती वेळ थांबेल याबद्दल हवामान विभागाचे तज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यात 8 सप्टेंबरपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, असं होसाळीकर यांनी सांगितलं आहे. त्यानुसार आज दुपारनंतर पासूनच राज्यात ठिकठिकाणी पावसाचं थैमान बघायला मिळत आहे.
येत्या दोन दिवसांत राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 8 सप्टेंबरपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. येथे दर्शविलेल्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदारची शक्यता आहे. IMD Mumbai keep watching updates for coming week end pl. pic.twitter.com/7LVAAXc0GT
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 6, 2022
राज्यातील विजांसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आला आहे. यामध्ये कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. या जिल्ह्यात पावसाचा जोर असणार आहे तर मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यातील विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली, नांदेडमध्ये पावसाची शक्यता आहे. विदर्भात बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात पाऊस थैमान घालण्याची शक्यता आहे
मागच्या 24 तासांत कुलाबा 50, कुडाळ, कणकवली, सावंतवाडी प्रत्येकी 40, खालापूर, डहाणू प्रत्येकी 30. पंढरपूर 50, कागल, आजरा 40 प्रत्येकी, शेगाव 30. हिंगोली 60, अंबड, मानवत प्रत्येकी 50, पैठण, मंथा, लातूर प्रत्येकी 40, पाथरी, वसमत, शिरूर, अनंतपाळ, गंगापूर, उदगीर, सेलू, परळी वैजनाथ, चाकूर प्रत्येकी 30. तुमसर, हिंगणघाट, चांदूर रेल्वे, दिग्रस प्रत्येकी 40, काटोल, कळंब, चंद्रपूर, सावळी, नरखेडा, महागाव, सडक अर्जुनी, वर्धा, देवरी, बाभूळगाव प्रत्येकी 30 मिमी पावसाची नोंद झाली
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.