Weather update : अंदमानजवळ (Andaman) निर्माण झालेल्या कमी दाबाचा पट्टा (Low pressure) अधिकाधिक तीव्र होत असल्याने महाराष्ट्र, तेलंगण आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांना धोका असल्याची वेधशाळेची माहिती आहे.
मुंबई, 10 ऑक्टोबर : पुढचा आठवडाभर राज्यभरात कमी-जास्त प्रमाणात पावसाचा अंदाज आहे. ऑक्टोबरमधला हा पाऊस सगळीकडे अतिमुसळधार नसला तरी विजांसह कोसळणाऱ्या या वादळी पावसाने फ्लॅश फ्लडचा धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे सावधान राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. अंदमानजवळ निर्माण झालेल्या कमी दाबाचा पट्टा अधिकाधिक तीव्र होत असल्याने महाराष्ट्र, तेलंगण आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांना धोका असल्याची वेधशाळेची माहिती आहे.
Heavy to very heavy rainfall is expected over few places in #AndhraPradesh, #Telangana and #Maharashtra. Thunderstorms accompanied with lightning and strong wind is expected to accompany this weather activity over a large area.https://t.co/CWdvD7U3MW
संपूर्ण राज्यभर आर्द्रतेत वाढ झाल्याने उकाडा वाढणार आणि त्याबरोबरच दुपारनंतर धुवांधार वादळी पाऊसही पडण्याची शक्यता आहे. पावसाचा अंदाज मान्सूनसारखा सर्वदूर वर्तवण्यात आलेला नाही. काही भागात अतिमुसळधार पाऊस पडू शकतो तर थोड्याच अंतरावर पावसाचं प्रमाण कमी असू शकतो. यामुळे कमी वेळात अधिक पाऊस बरसण्याचा धोका आहे. त्याबरोबर विजांचाही धोका असल्याने हवामानाचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडा, असा इशारा देण्यात आला आहे.
शनिवार आणि रविवारी मुंबई वगळता संपूर्ण कोकण परिसरात काही ठिकाणी विजांसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
मराठवड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाड्यातल्या बीड, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात जोरदार वाऱ्यांसह आणि विजांसह पाऊस येऊ शकतो. त्यामुळे शेतात कामासाठी बाहेर पडताना सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मंगळवारपर्यंत मराठवड्यात असंच वातावरण राहण्याची शक्यता आहे.
मान्सून परतीलाही विलंब
मंगळवार नंतर ठाणे, पालघर, पुणे, नाशिक, अहमदनगर, जालना आणि बीड या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातही अनेक ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे.
अंदमानमधला कमी दाबाचा पट्टा तीव्र झाल्याने त्याचा परिणाम म्हणून असं वादळी वातावरण निर्माण होत आहे. मान्सून परतीचा प्रवासही या वातावरण बदलामुळे लांबला आहे.