बब्बू शेख, (प्रतिनिधी)
मनमाड, 13 जुलै- देवळा तालुक्यातील मेशी इथे पाणी टंचाईने एकाच बळी घेतला आहे. पाण्याने भरलेला टँकर पलटी होऊन एका तरुणाचा जागेवर मृत्यू झाला आहे. सोपान चव्हाण असं या तरुणाचं नाव आहे.
मिळालेली माहिती अशी की, पाण्याने भरलेला टँकर पलटी होऊन त्याखाली दबून सोपानचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी देवळा तालुक्यातील मेशी इथे ही घटना घडली. गिरणा कालव्यातून पाणी भरून जात असताना एका वळणार ट्रॅक्टर पलटी झाल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली.
दरम्यान, राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस सुरू आहे. मात्र, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, देवळा भागात अद्यापही पावसाने दमदार हजेरी लावलेली नाही. त्यामुळे या भागातील अनेक गावांना आजही भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. पाणी टंचाईने या तरुणाचा बळी घेतल्याचे बोलले जात आहे.
पाणी आणण्यासाठी निघालेल्या मुलाचा ट्रॅक्टरखाली सापडून झाला होता मृत्यू
नाशिक जिल्ह्यात पाणी टंचाईने गेल्या महिन्यात एका मुलाचा बळी घेतला होता. पाणी आणण्यासाठी निघालेल्या एका 11 वर्षीय मुलाला आपला जीव गमावावा लागल्याची घटना बागलाण तालुक्यातील विरगाव येथे घडली होती. अक्षय गांगुर्डे असे या मृत मुलाचे नाव होते. अक्षय वडिलांसोबत पाणी आणण्यासाठी जात असताना ट्रॅक्टर उलटला. ट्रॅक्टरखाली दबून अक्षयचा दुर्दैवी मृत्यू झाला.
यंदा पाण्यासाठी सर्वत्र हाहाकार उडाला आहे. हंडाभर पाणी कसे व कुठून मिळेल, यासाठी दिवसरात्र अबालवृद्धांची धडपड सुरू असते. घरात पाणी नसल्याचे पाहून अक्षय वडिलांसोबत पाणी आणण्यासाठी जात असताना ट्रॅक्टरखाली सापडून त्याला जीव गमावावा लागला. अक्षयच्या मृत्यूने संपूर्ण सटाणा-बागलाण तालुक्यावर शोककळा पसरली होती.
VIDEO: एवढी गोंडस परी कुणाला 'नकुशी' झाली?