वाशिम, 13 ऑक्टोबर : परतीच्या पावसाने महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये धुमाकूळ घातला आहे. वाशिम जिल्ह्यातही वेगळी स्थिती नाही. जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.
एकीकडे, पावसामुळे ही स्थिती असतानाच दुसरीकडे रिसोड तालुक्यातील कुऱ्हा, मांडवा, गणेशपूर, जवळा, मोरगव्हाणसह अनेक गावातील शेतकऱ्यांच्या शेतात सोयाबीनला शेंगाच लागल्या नाहीत. त्यामुळे सोयाबीन काढणीचा खर्चही वसूल होत नाही. तर जिल्हा प्रशासनाने नजरअंदाज पैसेवारी 66 पैसे जाहीर केली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल की नाही अशी शंका निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर संतप्त शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रमुख दामूअण्णा इंगोले यांच्या नेतृत्वात रिसोडच्या तहसीलवर एल्गार मोर्चा काढला.
शेतकऱ्यांच्या एल्गार मोर्चामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर हे देखील सामील झाले होते. त्यांनी प्रशासनाकडे त्वरित वस्तुनिष्ठ पंचनामे करण्यासह एकरी 25 हजार मदत देण्याची मागणी केली आहे, जर शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळाली नाही तर विदर्भात आंदोलन तीव्र करून शेतकऱ्यांसोबत राज्यातील मंत्र्यांच्या घरी दसरा दिवाळी साजरी करणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
शेतकरी संघटनेच्या या आक्रमक भूमिकेनंतर तरी शेतकऱ्यांना प्रशासनाकडून योग्य मदत दिली जाते का, हे पाहावं लागेल.