वाशिम, 14 डिसेंबर : 'केंद्राने नुकत्याच केलेल्या तीन कृषी कायद्यांना महाराष्ट्र सरकार विरोध करत आहे. परंतु राज्य शासनाचे मार्गदर्शक असलेले आणि केंद्रात कृषी मंत्री राहिलेल्या शरद पवार यांनीच एकेकाळी राज्यातील मुख्यमंत्र्यांशी अशा कायद्याच्या समर्थनार्थ पत्र लिहिले होते. तेच आता कृषी कायद्याला विरोध करीत आहेत,' असं म्हणत भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी राज्य सरकारच्या भूमिकेचा समाचार घेतला आहे.
शरद पवारांनी या कृषी कायद्यातील एक-एक दोष दाखवून द्यावेत आणि मगच कायद्यांना विरोध करावा, असं आव्हानही शिवराय कुलकर्णी यांनी दिलं आहे. ते वाशिम येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी भाजपा कार्यकारिणीचे सदस्य राजू पाटील राजे, जिल्हा महामंत्री नागेश घोपे, शहराध्यक्ष राहुल तुपसांडे, नवीन शर्मा उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना शिवराय कुलकर्णी म्हणाले की, 'दिल्लीत सुरू असलेलं आंदोलन हे शेतकऱ्यांचं आंदोलन राहिलं नाही. शेतकरी संघटनांच्या सर्व शंकांचे पूर्ण निरसन करण्याची तयारी केंद्राने दाखवूनही या संघटनांचे नेते आपला हेका सोडण्यास तयार नाहीत. या संघटनांच्या नेत्यांना फक्त मोदी सरकारला अडचणीत आणायचे आहे .या आंदोलनाच्या आडून काही शक्ती अराजकता माजविण्याचा प्रयत्न करीत आहेत,' असा आरोपही त्यांनी केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.