जळगाव, 30 नोव्हेंबर : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीय वाऱ्यांच्या स्थितीमुळे राज्यावर पुन्हा आसमानी संकट ओढावलं आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा (Heavy Rainfall) अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर मध्यप्रदेशच्या (Madhya Pradesh) बुऱ्हाणपूर येथे अतिवृष्टीचा शक्यता वर्तवण्यात आल्याने महाराष्ट्रातील प्रशासनही सतर्क झालं आहे. बुऱ्हाणपूरमध्ये अतिवृष्टी झाली तर हातनूर धरणात (Hatnur Dam) पाण्याच्या पातळीत वाढू होऊ शकते. त्यामुळे जळगावात (Jalgaon) तापी नदीच्या (Tapi River) काठावर असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या अवकाळी पावसाच्या अंदाजानुसार बुऱ्हाणपूर मध्यप्रदेश क्षेत्रात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानुसार तापी नदीच्या पातळीत वाढ होऊन भुसावळ तालुक्यातील हातनूर धरणात पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला असल्याची माहिती हातनूर धरणाचे शाखा अभियंता एन पी महाजन यांनी मंगळवारी (30 नोव्हेंबर) दिली आहे.
हेही वाचा : समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ, जात पडताळणी समितीकडून होऊ शकते चौकशी!
हवामान खात्याने जळगाव जिल्ह्यासह मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर क्षेत्रात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली आहे. दरम्यान 30 नोव्हेंबर ते दोन डिसेंबरपर्यंत विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापी नदीमधील पाण्याची पातळी वाढ होऊन हतनूर धरणाच्या पाण्याच्या पातळीतही वाढ होण्याची शक्यता असल्याने तापी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाचे ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. सध्या दक्षिण-पूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीप परिसरात चक्रिय वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. तसेच पूर्व-मध्य अरबी समुद्रात द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. येत्या 24 तासात दक्षिण-पूर्व अरबी समुद्र, मालदीव आणि लक्षद्वीप परिसरात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह वेगवान वाऱ्याच्या साथीने जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे", असं होसाळीकर यांनी सांगितलं.
हेही वाचा : परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी कडक नियमावली जाहीर, मुख्य सचिवांचा पहिला आदेश
हवामान खात्याने आज मुंबई, पालघर, ठाणे, नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या 14 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. आज सकाळपासूनच संबंधित जिल्ह्यांत ढगाळ हवामानाची नोंद झाली आहे. राज्यात उद्यापासून आणखी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. उद्या पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, ठाणे, मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.