भास्कर मेहेरे, यवतमाळ 28 मार्च : राज्यात आणि मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत असताना विदर्भातून एक दिलासा देणारी बातमी आहे. यवतमाळमध्ये कोरोनाचे तीन पॉझिटीव्ह रुग्ण बरे झाले असून त्यांचा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. त्या तिघांनाही आज सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनावर मात करता येते हे स्पष्ट झालं आहे. कोरोना झाला म्हणजे सगळं संपलं असं नाही. त्यातून पेशंट बरे होऊ शकतात हे सगळ्यांना लक्षात घेतलं पाहिजे असं मत डॉक्टरांनी व्यक्त केलंय.
यवतमाळ येथील स्व.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात दाखल असलेल्या तीन नागरिकांचे नमुने पॉझेटिव्ह आले होते. मात्र 14 दिवसानंतर पुन्हा त्यांचे दोन नमुने प्रयोगशाळेत पाठविले असता आता या तीनही नागरिकांचे नमुने निगेटिव्ह आले आहे. तिघांनाही आता विलगीकरण कक्षातून आज (28मार्च) सुट्टी देण्यात आली आहे.
त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात आता कोरोना विषाणू संसर्ग पॉझेटिव्ह असल्याची संख्या शुन्यावर आली आहे. या तिघांनाही पुढील 14 दिवस आरोग्य विभागाच्या निगराणीखाली घरात विलगीकरणात ठेवण्यात येणार असल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाने दिली आहे. दुबईवरून जिल्ह्यात आलेल्या नऊ जणांना कोरोनाची लक्षणे असल्यामुळे 12 मार्च रोजी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते.
क्वारंटाइन असताना बाहेर पडलात तर खबरदार, पोलीस दररोज करणार VIDEO CALL
या सर्वांचे थ्रोट स्वॅबचे नमुने तपासणीकरीता नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले. यापैकी तीन जणांचे नमुने पॉझेटिव्ह तर उर्वरीत सहा जणांचे नमुने निगेटिव्ह आले होते.त्यामुळे इतरांना सुट्टी देण्यात आली होती. तर पॉझेटिव्ह नमुने असलेले हे तीन जण तेव्हापासूनच विलगीकरण कक्षात दाखल होते. याच ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू होते.
नियमानुसार या तिघांचे उर्वरीत दोन नमुने 14 दिवसानंतर तपासणीसाठी पुन्हा पाठविण्याच्या सुचना महाविद्यालय प्रशासनास देण्यात आल्या होत्या त्यानुसार तिनही नागरिकांचे नमुने 26 मार्च रोजी नागपूरला पाठविण्यात आले. त्याचा रिपोर्ट 27 मार्चला मिळाला. तो रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्यामुळे उर्वरीत शेवटचे नमुने 27 मार्चला पुन्हा नागपूरला पाठविले. तिनही नागरिकांचा हा शेवटचा रिपोर्ट ही निगेटिव्ह आला असून तो 28 मार्च रोजी प्राप्त झाला.
दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे या तिनही नागरिकांना विलगीकरण कक्षातून आज सुट्टी देण्यात आली आहे. मात्र त्यांना पुढील 14 दिवस घरातच विलगिकरणत ठेवण्यात येणार असून आरोग्य विभागाचे पथक त्यांची नियमित तपासणी करणार आहे.
शुक्रवारी रात्री एका नागरिकाला विलगीकरण कक्षात दाखल केल्यामुळे सद्यस्थितीत विलगीकरण कक्षात केवळ एक नागरिक आहे. तर जिल्ह्यात गृह विलगीकरणात असलेल्या नागरिकांची संख्या 89 झाली आहे अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.