अमरावती, 30 सप्टेंबर : उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील सामूहिक अत्याचार प्रकरणातील 19 वर्षीय पीडितेचा दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. त्यामुळे देशभरात या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली असून संपूर्ण देशात आंध्रप्रदेश आणि तेंलगणा सारखा दिशा कायदा लागू करावा अशी मागणी नवनीत राणा यांनी केली आहे.
खासदार नवनीत राणा या अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून लोकसभा सभागृहात प्रतिनिधीत्व करत आहे. मुली व महिलांवर अत्याचार करणाऱ्याला तात्काळ फासावर लटकवून दिलं पाहिजे. या नराधमाविरुद्ध तक्रार दाखल करताच त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, असंही नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.
'फिल्म सिटी काढायला निघालेत, महिला मात्र असुरक्षित'; महाराष्ट्रातून संताप व्यक्त
शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी उत्तर प्रदेशातील संतापजनक घटनेवरून योगी सरकारवर जोरदार टीका केली आहे. 'उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री फिल्म सिटी काढायला निघाले आहेत. मात्र त्या राज्यात महिला सुरक्षित नाही. अशा ठिकाणी साक्षीदार संरक्षण कायदा आणि संबंधित मुलींना संरक्षण देणे. तसंच आरोपींना लवकरात लवकर शिक्षा होणे अतिशय गरजेचे आहे. उत्तर प्रदेश सरकारने बेजबाबदारपणा आणि अतिशय अयोग्य वर्तन केलेले आहे. याविषयी लक्ष वेधणारे निवेदनाचे पत्र माननीय राष्ट्रपती महोदय आणि राज्यपाल महोदय यांच्याकडे दिलेले आहे,' अशी माहिती शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे.
'गुन्हेगारांना एक महिन्याच्या आत फाशीची शिक्षा व्हावी अशी आमची मागणी आहे. हाथरसच्या घटनेमधून परत महिलेल्या सुरक्षासंदर्भात उतर प्रदेशात भीषण अवस्था समोर आलेली आहे. मला असं वाटतं की फार मोठ्या प्रमाणामध्ये उत्तर प्रदेश सरकारमधील लोक जबाबदार आहेत, त्या सगळ्यांची चौकशी आणि त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे,' अशी आक्रमक भूमिका नीलम गोऱ्हे यांनी घेतली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.