शिवाजी गोरे, दाभोळ 8 जून : सागरी सुरक्षेविषयी कायम चर्चा होत असताना एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कोकणातल्या दाभोळ खाडीत चीनच्या दोन मासेमारी बोटी आढळून आल्याने खळबळ उडाली होती. मात्र आता या बोटींचा खुलासा झाला आहे. इथल्या बंदरात या बोटी दुरुस्तीच्या कामासाठी आल्या होत्या. मात्र संबंधीत कंपनीने त्याच्या परवानगीचे कागदपत्र उशीरा सादर केल्याने या बोटींना चौकशीला सामोरे जावे लागले.
चीनच्या दोन बोटी दोभोळ बंदरात दाखल झाल्याने खळबळ उडाली होती. या बोटींवर 37 खलाशी होते. या बोटी दुरुस्तीसाठी आणल्याचा दावा बोट मालकांनी केला होता. मात्र या बोटींकडे कुठल्याही परवानग्या नव्हत्या आणि कागदपत्रही नव्हती. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांची चिंता वाढली होती. या बोटींच्या मालकांनी दाभोळच्या एका स्थानिक कंपनीशी देखभालीसाठी करार केला होता. मात्र त्यांनी परवानगीची कागदपत्र लवकर सादरच केली नाहीत. त्यामुळे या बोटींना तटरक्षक दलांनी थांबवून घेतलं होतं.
चीनच्या या मासेमारी बोटी दिडशे फुट लांबीच्या आहेत. या मोठ्या बोटी आढळून आल्याने सुरुवातीला सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. दुसऱ्या देशाच्या हद्दीत जाण्यासाठी संबंधीत बोटींना विविध परवानग्या घ्याव्या लागतात. त्यानंतरच अशा बोटी त्या सागरी हद्दीत नेता येतात. त्यामुळे दाभोळ पोलीस आणि विविध सुरक्षा संस्थांनी याची कसून चौकशी केली.
या प्रकरणी रत्नागिरीतल्या खाजगी मरीन एजन्सीचीही चौकशी करण्यात आली. या बोटींविषयी कुठलीच पूर्वकल्पना संबंधीत यंत्रणांना नसल्याने त्याविषयीचं गुढ वाढलं होतं. चीनबद्दल कायम संशयाचं वातावरण असल्याने सुरक्षा कारणांबाबातही चिंता व्यक्त करण्यात येत होती.
परवानगी नसताना या बोटी जर दाभोळ खाडीपर्यंत आल्या असतील तर त्या एवढ्या आतमध्ये येईपर्यंत कुणालाच कसं कळालं नाही असाही प्रश्न विचारण्यात येत होता. आता खुलासा झाल्याने सगळ्यांचा जीव भांड्यात पडलाय.